पावसात सीबीडीच्या डोंगरावर फिरायला गेलेल्या 350 जणांना अतिउत्साहीपणा नडला


मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईसह संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला असून गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. त्यात काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला. एकीकडे गरजेशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनासह मुख्यमंत्र्यांकडूनही करण्यात येत आहे. पण कोरोनासह सर्व नियम धाब्यावर बसवत नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांचा अतिउत्साहीपणा नागरिकांना चांगलाच महागात पडला आहे.

स्वतः मुख्यमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणांकडूनही मुसळधार पावसात गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आवाहन सातत्याने केले जात होते. पण अशातच काही नागरिकांना त्यांचा अतिउत्साहीपणा चांगलाच भोवला आहे. नागरिकांच्या याच बेफिकीरपणामुळे नवी मुंबईतील काही नागरीक अनेक तास पावसात अडकून पडले होते. नवी मुंबईच्या सीबीडी भागात असलेल्या एका डोंगरातून काल तब्बल 350 जणांची अग्निशमन दलाने सुटका केली आहे.

काही नागरिक लहान मुलांसह काल रविवारच्या दिवशी फिरण्यासाठी गेले होते. पण मुसळधार पावसामुळे ओढ्याचे पाणी वाढले, अन् या पाण्याचा वेग एवढा भयंकर होता की, नागरिकांचा परतीचा मार्गच बंद झाला. अखेर या नागरिकांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली. अग्निशमन दलाने या ओढ्यात मानवी साखळी करून तब्बल 350 जणांची सुखरुप सुटका केली आहे. यामध्ये अनेक लहान मुलेही होती.

सीबीडीपाठोपाठ काही नागरिकांचा अतिउत्साह डोंबिवलीतील शीळफाटा येथेही पाहायला मिळाला. नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दुषणांचा धनी ठरणारा मार्ग म्हणजे, डोंबिवलीकडे जाणारा शिळफाटा. पण काल या शिळफाट्यावर वाहनांचे नव्हे तर जनतेचे ट्रॅफिक जाम पाहायला मिळाले. शिळफाटा मार्गाची मुसळधार पावसामुळे काय अवस्था झाली होती हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दरम्यान पावसाच्या प्रवाहातून वाचण्यासाठी मानवी साखळी तयार करण्यात आली होती. पाण्याखाली गेलेल्या रस्त्यातून जीव मुठीत धरुन वाट काढावी लागत होती. शिळफाटा परिसरातील जवळपास सगळ्याच दुकानात पाणी शिरले होते.

काल मुंबईत मुसळधार पावसामुळे मृत्यूतांडव पाहायला मिळाले. दरड आणि भिंत कोसळण्याच्या वेगवेगळ्या दुर्घटनेत 30 जणांना जीव गमवावा लागला. मुंबईसह लगतच्या शहरांची पावसाचे हे रौद्र रुप पाहुन झोप उडाली असतानाच, आज मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर 19 ते 22 जुलै या कालावधीसाठी मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव आणि परभणीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.