ओबीसी आरक्षणावरुन फडणवीसांची ठाकरे सरकार जोरदार टीका


मुंबई – ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ भाजपकडून राज्यात करण्यात आला आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. राज्यातील ओबीसी आरक्षण सरकारच्या वेळकाढूपणामुळे गेले असा निशाणा त्यांनी साधला. या सरकारने ओबीसींचं संपूर्ण आरक्षण संपवण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा महत्वाचा झाला आहे. रोज खोटे बोल पण रेटून बोल, अशा प्रकारे महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात. नेते कमी बोलतात कारण त्यांना माहिती आहे. आपल्या चुकीमुळे राजकीय आरक्षण गेले असल्यामुळेच त्यांचे बोलके पोपट बोलत आहेत. त्यांचे मालक जसे सांगत असतात तसे ते बोलत असतात, अशी जोरदार टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आपले सरकार असताना ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात केस आली. तेव्हा केस काय होती? पाच जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांच्या वरच्या आरक्षणाविरोधातील ती केस होती. ५० टक्क्यांच्या आतल्या आरक्षणाची केसच नव्हती. त्याही वेळेला आपण ५० टक्क्यांचे वरचे आरक्षण वाचवण्यासाठी एक अभ्यास केला आणि त्यातून एक अध्यादेश काढला. तो न्यायालयाला सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने देखील तो मान्य केला. ५० टक्क्यांच्या वरचे आरक्षणही मान्य करून पुढे जाण्याची मंजुरी दिली.

हे सरकार आल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोग गठीत करायचा होता आणि इम्पेरिकल डेटा जमा करायचे परिपत्रक काढून सर्वोच्च न्यायालयाला द्यायचे होते. आपल्याला पाहिजे तितका वेळ सर्वोच्च न्यायालयाने दिला असता. १५ महिने या सरकारने वाया घालवले. सात वेळा तारखा घेतल्या आणि कोणतीच हालचाल केली नाही. सरकारने मार्चमध्ये एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आणि सांगितले आमच्या काही जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांच्या वर राजकीय आरक्षण आहे. या संदर्भात न्यायालयाने निर्णय घ्यावा. निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, आम्ही दिलेल्या निर्देशांचे पालन या सरकारने केले नाही. या सरकारने फक्त वेळेकाढूपणा केला.

सरकारला सांगूनही राज्य मागसवर्गीय आयोग गठीत केला नाही. कोणतीच हालचाल करण्याची सरकारची मानसिकता नसल्यामुळे न्यायालयाने राज्यातील ५० टक्क्यांच्या आतील सर्व राजकीय आरक्षण रद्द केले. तसेच हे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत राजकीय आरक्षण देता येणार असा निर्णय दिला, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना मोदी सरकारची स्तुतीही केली. देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री हे ओबीसी समाजाचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मोदींच्या नेतृत्वाखाली देशात बहुजनांचे राज्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ओबीसीचा खरा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे, हे सांगायला देखील ते विसरले नाहीत.

संविधानात ओबीसींना स्थान देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचे देखील त्यांनी सांगितलं. मुंबई येथे आयोजित भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आशीष शेलार, मंगल प्रभात लोढा, खा. संगम लाल गुप्ता, डॉ. संजय कुटे, अतुल भातखळकर, योगेश टिळेकर उपस्थित होते.