अंजली दमानियांची शरद पवार-नरेंद्र मोदी भेटीवर खोचक प्रतिक्रिया


मुंबई – दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. या दोन्ही शीर्षस्थ नेत्यांमध्ये या भेटीमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणत्या बाबींवर चर्चा झाली, याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सहकार क्षेत्राविषयी ही भेट झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी जरी सांगितले असले, तरी त्यावर राजकीय विश्लेषक आणि इतरांचा विश्वास बसलेला नाही.


दरम्यान या भेटीसंदर्भात ट्विट करून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खोचक टोला लगावला आहे. तसेच, या भेटीचा थेट संबंध राज्याच्या राजकारणाशी जोडला आहे. त्यामुळे या भेटीनंतर राज्यातल्या राजकारणाची हवा चांगलीच तापू लागली आहे. आपल्या ट्विटमध्ये अंजली दमानिया म्हणतात, १५ जुलैला फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?), १६ जुलैला फडणवीस दिल्लीला जातात, १७ जुलैला शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही.