
मुंबई : कोव्हिड-19 वरील ज्यांनी दोन्ही लसी घेतल्या असतील आणि लसी घेतल्यानंतर 15 दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सादर करण्याची गरज राहणार नाही. मात्र अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या ‘कोविन’ या पोर्टलवरून प्राप्त केलेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत.
लसींचे दोन डोस घेतलेल्यांना ‘आरटीपीसीआर’मधून सूट
आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या अंतर्गत दिलेल्या अधिकारांनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य सचिवांनी हा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही ही सूट लागू असेल असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
ही सूट लागू असली तरीही लसीकरण झालेल्या अथवा न झालेल्या सर्व प्रवाशांना कोव्हिड रोखण्यासाठी उचित नियमांचे (चेहऱ्यावर मास्क परिधान करणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, शारिरीक अंतर राखणे इ.) पालन करणे बंधनकारक राहणार आहे. इतर सर्व नागरीकांसाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीच्या वैधतेचा काळ 48 तासांवरून वाढवून 72 तास इतका करण्यात आल्याचे एका पत्रका मार्फत प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
