येत्या काही दिवसांत शिथील होऊ शकतात निर्बंध ; अस्लम शेख


मुंबई: राज्यावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यामुळे मुंबईसह राज्यात निर्बंध आणखी शिथील करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असे सांगण्यात येत होते. पण, तसा कोणताच निर्णय बुधवारच्या बैठकीत घेण्यात न आल्यामुळे निर्बंध शिथील होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या विविध घटकांचा हिरमोड झाला असतानाच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज महत्त्वाची माहिती दिली आहे.

आज निर्बंधांबाबत अस्लम शेख यांना विचारणा करण्यात आली असता येत्या काही दिवसांत निर्बंध शिथील होऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहेत. सरकार निर्बंध शिथील करण्याबाबत सकारात्मक विचार करत आहे. त्यात हॉटेल व्यवसाय, व्यापारी, कापड उद्योग यांना कशाप्रकारे सूट द्यायची व सर्व व्यवहार सुरळीत कसे करायचे यावर विचार केला जात असल्याचे शेख यांनी सांगितले. अनलॉक प्रक्रिया रखडण्यास एकप्रकारे केंद्र सरकार जबाबदार असल्याचे सांगण्याचा शेख यांनी प्रयत्न केला. राज्य अनलॉक होण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, केंद्र सरकारकडून पुरेसा लसपुरवठा होत नसल्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला असून अनलॉकच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात त्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे, असे शेख म्हणाले.

दरम्यान, मुंबई लोकल सेवा सर्वांसाठी कधी सुरू होणार, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली होती. पण, यावर मंत्रिमंडळ बैठकीत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवर बोट ठेवत राज्यात आहेत, ते निर्बंध कायम ठेवण्याचे राज्य सरकारने निश्चित केले. यावर बोलताना कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस ज्यांनी घेतले आहेत, त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार सुरू असल्याचे शेख यांनी सांगितले.