शरद पवारांनी नाना पटोलेंच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केली नाराजी!


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची काल सिल्वर ओकवर बैठक झाली. यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तुम्ही वेगळेच लढणार असाल, तर आधीच सांगा. आम्हालाही तयारीला लागता येईल, असे ते म्हणाले. जर दिल्लीवरून ठरले असेल, तर आम्हाला काही अडचण नाही किंवा नाना पटोलेंना अधिकार दिले असतील, तर तसेही सांगा, असे शरद पवार म्हणाले असल्याची माहिती आहे.

शरद पवार म्हणाले की, पक्ष वाढवण्यासंदर्भात कोणाच्याही मनात दुमत नाही, पण सोबत असलेल्या पक्षांना दुखावणे योग्य नाही, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीला नाना पटोले मात्र गैरहजर होते. दरम्यान बारामतीत बोलताना शरद पवार यांनी म्हटले होते की, नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर बोलणार नाही, सोनिया गांधी बोलल्या असत्या, तर मी भाष्य केले असते असा टोला देखील त्यांनी लगावला होता. काँग्रेसकडे विधानसभेचे अध्यक्षपद राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंध नाही. आम्हा तिन्ही पक्षाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

शरद पवार कॉंग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर म्हणाले होते की, आपला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करणार की नाही. त्यामुळे ते आपले बळ वाढवण्याचा प्रयत्नात असणार. त्यांनी भूमिका घेतली, यात काहीही चुकीचे नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आपआपला पक्ष चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी, अशी इच्छा असणार. यात काहीही चुकीचे नाही. त्यामुळे यात गैरसमज असण्याचे काहीही नाही. सरकार एक विचाराने आहे की नाही हे महत्वाचे आहे. ते एक विचाराने काम करतात, असे पवार म्हणाले.