ठाकरे सरकारचा एसईबीसी आणि ईएसबीसी प्रवर्गातील उमेदवारांना मोठा दिलासा


मुंबई – राज्य सरकारने नुकताच मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. ईएसबीसी प्रवर्गातून 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या असतील, त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे.

मुंबई उच्च न्यायालनाने 14 नोव्हेंबर 2014 रोजी ईएसबीसी प्रवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या किंवा पदांच्या आरक्षणाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने या आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीबाबत 21 फेब्रुवारी, 2015 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला होता. या अध्यादेशाचे पुढे कायद्यात रूपांतर होऊन आरक्षण अधिनियम, 2014 अस्तित्वात आला. उच्च न्यायालयाने या अधिनियमाविरोधातील दाखल रिट याचिकांवर 7 एप्रिल 2015 रोजीच्या आदेशानुसार या अधिनियमाला स्थगिती दिली होती.

न्यायालयाचे आदेश लक्षात घेता 21 फेब्रुवारी 2015 च्या आदेशात सुधारणा करून ईएसबीसी प्रवर्गाकरिता आरक्षणाबाबत 2 डिसेंबर, 2015 च्या शासन शुद्धिपत्रकान्वये सुधारित आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शासकीय व निमशासकीय सेवेतील रिक्त पदांसाठी 14 नोव्हेंबर, 2014 पूर्वी ईबीसी प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणासह जाहिरात दिलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत खुल्या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून तात्पुरत्या स्वरूपात जास्तीत जास्त 11 महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा या न्यायालयीन प्रकरणाचा अंतिम निर्णय, यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका करण्याचा निर्णय राज्य सरकारने निर्णय घेतला होता. आता 5 जुलै 2021 च्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने या तात्पुरत्या स्वरुपातील नेमणुका कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणासंदर्भातील एसईबीसी कायदा, 2018 लागू झाल्यानंतर त्यासंदर्भातील दाखल सिव्हिल पिटीशनच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर, 2020 रोजी या कायद्याला स्थगिती दिल्यामुळे यापूर्वी सुरू करण्यात आलेली आणि विविध टप्प्यांवर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया स्थगित झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने 5 मे, 2021 रोजी या सिव्हिल पिटीशनच्या अनुषंगाने अंतिम निर्णय देऊन हा आरक्षण कायदा अवैध ठरवून एसईबीसी वर्गाचे आरक्षण रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच 9 सप्टेंबर, 2020 पर्यंत एसईबीसी आरक्षणासह सुरू केलेली आणि विविध टप्प्यांवर प्रलंबित असलेल्या भरतीप्रक्रिया पूर्ण करणे आणि या भरतीप्रक्रियेत समाविष्ट उमेदवारांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार एसईबीसी उमेदवारांचा अराखीव व इडब्ल्यूएस प्रवर्गात विचार करण्यात यावा आणि असे करताना एसईबीसीच्या ज्या उमेदवारांनी अराखीव प्रवर्गाकरीता विहित करण्यात आलेली वयोमर्यादा ओलांडली असेल त्यांच्याबाबतीत जाहिरातीतील तरतुदीनुसार मागासवर्गीयांना देय असलेली वयोमर्यादा व परीक्षा शुल्काची सवलत कायम ठेवण्यात येईल, असे या निर्णयात राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 9 सप्टेंबर, 2020 पर्यंत सुरु केलेल्या ज्या निवड प्रक्रिया प्रलंबित आहेत अथवा ज्या नियुक्त्या प्रलंबित असतील अशा प्रकरणामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण लागू असेल आणि एसईबीसी उमेदवारांनी ईडब्ल्यूएसचा विकल्प स्वीकारला असेल तसेच त्यासाठी ते पात्र असतील तर अशा उमेदवारांसाठीही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार अशा निवडप्रक्रियांमध्ये एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षण अनुज्ञेय करताना, सन 2018-19 व सन 2019-20 मधील परीक्षांसाठी मार्च 2020 व सन 2020-21 मधील परीक्षांसाठी मार्च 2021 पर्यंत ग्राह्य असणारे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

तसेच अराखीव (खुला) असा विकल्प ज्या एसईबीसी महिला उमेदवार देतील अशा महिला उमेदवारांनी संबंधित पदाची / परीक्षेची जाहिरात (दोन किंवा अधिक टप्प्यांची परीक्षा असल्यास पूर्व परीक्षेची) प्रसिद्ध झालेली आहे, त्या जाहिरातीनुसार एसईबीसी आरक्षणासाठी प्राप्त केलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमिलेअर) प्रमाणपत्र हे अराखीव महिला पदासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.