कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ असू शकते तिसऱ्या लाटेची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले संकेत


मुंबई – महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या पहिल्या अकरा दिवसांमध्ये कोरोनाचे ८८ हजार १३० रुग्ण आढळून आले. आता तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ह्या आकडेवारीमुळे व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली ही वाढ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या आधीच्या दोन लाटांप्रमाणेच ह्याही लाटेचे स्वरुप आता दिसून येत आहे.

दुसऱ्या लाटेदरम्यान दिल्लीत २५ हजार नवे कोरोनाबाधित आढळून आले होते. पण केवळ ८७० रुग्ण १ जुलै ते ११ जुलै या कालावधीत आढळून आले आहेत. केरळ हे एकमेव राज्य असे आहे, जिथे महाराष्ट्रापेक्षाही जास्त कोरोनाबाधितांची संख्या आहे. केरळमध्ये गेल्या ११ दिवसांमध्ये १ लाख २८ हजार ९५१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.

गेल्या ११ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ३००० हून अधिक बाधितांची नोंद झाली, तर गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या ६००च्याही खाली आली आहे. कोरोनासाठीच्या विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात की, कोल्हापूरमधील परिस्थिती काहीशी विचित्र आहे. तिथे लसीकरणाची आकडेवारी सर्वाधिक आहे, पण कोरोनाबाधित आढळण्याचा दर म्हणजेच पॉझिटिव्हिटी रेटही सर्वात जास्त आहे.

पुढे जोशी म्हणतात, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा सध्या धोका आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणे आणि लसीकरणाचा मंदावलेला वेग यामुळेच हा धोका निर्माण झाला आहे. कंटाळा किंवा सक्ती केल्यामुळे लोक घरात राहायला तयार नाहीत. तसेच मास्क आणि स्वच्छता त्याचबरोबर इतर नियमांचे पालन करत नसल्यामुळे या व्हायरसचे फावते आणि त्याचा प्रादुर्भाव व्हायला संधी मिळते आहे.

जेव्हा दोन्ही लाटा आपल्या सर्वोच्च बिंदूवर होत्या, त्यादरम्यान महाराष्ट्रातच सर्वाधिक रुग्ण हे आढळून आले आहेत. आता महाराष्ट्रात वाढणारी बाधितांची संख्याही अशाच प्रकारची दिसून येत आहे. फोर्टीस हिरानंदानी रुग्णालयाचे डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेच्या शेवटी मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली होती. पण जुलैच्या पहिल्या १० दिवसांमध्ये ही संख्या कमालीची वाढली आहे. राज्यात या काळात ७९ हजार ५०० नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तज्ज्ञांनी सांगितले की जुलैच्या पहिल्या ११ दिवसांमध्ये वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या हा धोक्याचा इशारा आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी बाधितांचा उच्चांक दिसून आला आहे.