शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला टेम्पोने दिली धडक


हिंगोली – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या असून, सुखरुप आहेत. आज (१० जुलै) भरधाव टेम्पोने वर्षा गायकवाड यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. शिक्षणमंत्री पदाबरोबरच वर्षा गायकवाड यांच्याकडे हिंगोलीच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी आहे. हा अपघात हिंगोलीच्या दिशेने जात असतानाच झाला. पण, याबाबत वर्षा गायकवाड यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

हिंगोलीच्या वर्षा गायकवाड या पालकमंत्री असून, त्या दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या कारला हिंगोली दौऱ्यावर असतानाच टेम्पोने मागच्या बाजूने धडक दिल्याची माहिती समोर आली. या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. हिंगोलीतील ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन करुन रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी वर्षा गायकवाड निघाल्या होत्या. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव महिंद्रा पीकअपने वर्षा गायकवाड यांच्या कारला धडक दिली. यामध्ये कारचे मागच्या बाजूने नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात वर्षा गायकवाड यांच्यासह कुणालाही दुखापत झाली नाही.

हिंगोलीत वाढत्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसचे स्व. नेते राजीव सातव यांच्या कार्याला उजाळा दिला. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता, हिंगोली जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन क्षमतेत वाढ करणे आणि ऑक्सिजन उपलब्धतेबाबत जिल्ह्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी माझे बंधू स्वर्गीय राजीवजी सातव यांनी अतोनात प्रयत्न केले होते. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सिजन क्षमता वाढवण्यावर आमचा भर आहे. आणखी पाच ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल. राजीवजी यांच्या प्रयत्नांना यश मिळवून देऊ, असं वर्षा गायकवाड यांवेळी म्हणाल्या.

दोन दिवसांपासून वर्षा गायकवाड हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी विविध विषय आणि प्रश्नांसंदर्भात बैठकाही घेतल्या. हिंगोली जिल्ह्यात खेळाडूंच्या सोयीसाठी नव्याने जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात येत आहे. या दौऱ्यात पालकमत्री गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. त्याचबरोबर हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर हिंगोलीतील नियोजित कार्यक्रमानुसार रामलीला मैदानापर्यंत जाण्यासाठी निघाल्या असताना वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाला.