कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना


मुंबई: कोरोनाची दुसरी लाट तुर्तास ओसरली असली तरी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. राज्य सरकार त्या पार्श्वभूमीवर सज्ज झाले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा राज्यातील अर्थचक्रावर कोणताही परिणाम होऊ नये, या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली व कोरोना स्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या उद्योगपतींची बैठक घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरू ठेवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कंपनीच्या आवारात ज्या उद्योजकांना कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे, त्यांनी वेळीच तसे नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून कामगारांची तिथे राहण्याची (फिल्ड रेसिडन्स) व्यवस्था करावी. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांना आवश्यक ते सहकार्य करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

कोरोनाची दुसरी लाट अद्यापही पूर्णपणे ओसरलेली नाही. पण अशा परिस्थितीतही कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन आपण हळुवारपणे काही आर्थिक उपक्रम सुरू करत आहोत. हे करताना कुठलेही निर्बंध कागदावर राहणार नाहीत, ते काटेकोरपणे अंमलात येतील, कुठेही गर्दी होणार नाही, सभा समारंभ होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

आता पावसाळा आहे, या काळात साथीचे इतर आजार उद्भवतात. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. याच काळात आपले सणउत्सव सुरू होतात. ही सगळी परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय ऑक्सिजनच्या तयारीचाही आढावा घेतला. त्यांनी ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा आणि रुग्णसंख्या वाढल्यास करावयाची पूर्वतयारी या सर्वच प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत गावागावांत जनजागृती करून कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले सर्वजण दुसरा डोस वेळेत घेतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. लसीचे दोन्ही डोस घेऊन कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या, त्यांची स्थिती आणि कारणे याचे टास्क फोर्सने विश्लेषण करावे, ही माहिती संकलित करताना ती अनुभवजन्य राहील याची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी पॉझिटिव्हीटी दर जास्त असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील उपाययोजना व स्थितीचा आढावा घेतला. यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर तुलनेने कमी होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जनुकीय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) करून घेण्याचे निर्देशही आरोग्य विभागाला दिले. होमगार्ड नियुक्त्या, फिरती चाचणी केंद्रे आणि इतर आरोग्य सुविधांविषयक मागणीची दखल घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.