आदिवासी भागात कोरोनावरील उपचारासाठी ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी : छगन भुजबळ


नाशिक : कोरोनाविषयी असलेले गैरसमज व भीतीमुळे उपचारासाठी आदिवासी बांधव पुढे येत नव्हते. अशा वेळी आदिवासी बांधवांचा ज्या उपचार पद्धतीवर विश्वास व उपचार घेण्याची तयारी आहे, अशी आयुर्वेदिक उपचार पद्धती सुरगाण्यासारख्या आदिवासी भागात पोहोचवून आदिवासी बांधवावर उपचार करण्यात आले. या माध्यमातून कोरोनामुक्तीचा ‘सुरगाणा पॅटर्न’ आदिवासी भागात प्रभावी ठरला आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

भुजबळ फॉर्म येथे ‘सुरगाणा पॅटर्न’ यशस्वीपणे राबविणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील वैद्यकीय क्षैत्रातील मान्यवरांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, दैनिक सकाळचे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक राहूल रनाळकर, वैद्य विक्रांत जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी व आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, आदिवासी भागातील बांधवांना कोरोनावरील उपचार व लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करणे खूप कठीण काम होते. पंरतु आपली वर्षानुवर्षे चालत असलेली आयुर्वेदिक उपचार पद्धती कोरोना काळात वरदान ठरली आहे. सुरगाण्यात यशस्वी ठरलेल्या सुरगाणा पॅटर्न शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

आयुर्वेदाच्या माध्यमातून वैद्य विक्रांत जाधव यांनी मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा केली असून ही बाब अतिशय कौतुकास्पद व समाजाला आदर्श देणारी आहे. कोरोनाकाळात सुरगाण्यासारख्या आदिवासी भागात सेवा देणारे सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. परंतु कोरोनाची लढाई अजून संपलेली नसून हा स्वल्पविराम आहे, पुढे येणाऱ्या नवीन आव्हानासाठी सर्वांनी सज्ज राहून आपले काम सुरु ठेवावे, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

कोरोनाकाळात लोककलेच्या माध्यमातून आदिवासी बांधवामध्ये जनजागृती केल्याने अधिक प्रमाणात आदिवासी बांधव लसीकरण व उपचारासाठी पुढे येताना दिसत असल्याचे चित्र समाधानकारक आहे, असे मतही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, सुरगाणा पॅटर्न स्तुत्य उपक्रम आहे. हा उपक्रम आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात आला आहे. सुरगाणा पॅटर्न यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले आहे.