वारकऱ्यांचा असा अपमान? थेट अटकेची कारवाई ही सर्वथा चुकीची – देवेंद्र फडणवीस


मुंबई – राज्य सरकारकडून यंदा देखील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करत, पायी वारीस परवानगी नाकारलेली आहे. तर , राज्य सरकारच्या आदेशाला न जुमानता पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी केलेल्या या कारवाईवरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक! विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय! श्रद्धा-परंपरांचे महत्त्व आहेच! बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधले? काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकर्‍यांचा असा अपमान? थेट अटकेची कारवाई ही सर्वथा चुकीची आहे! तीव्र निषेध! अशा शब्दांमध्ये ट्विट करत, या कारवाईवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात स्थानबद्ध केले आहे. त्यानंतर या ठिकाणी वारकऱ्यांसह त्यांच्य समर्थकांची गर्दी जमू लागली आहे. दरम्यान स्थानिक आमदार महेश लांडगे हे देखील त्यांच्या भेटीसाठी पोहचल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये २३ जण कोरोनाबाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले. संबंधितांवर म्हाळुंगेतील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू असले, तरी काही प्रमाणात घबराट उडाली आहे.