राज्यमंत्री बच्चू कडू उचलणार अनाथ भावंडांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च


इनायतपूर : चांदूर बाजार तालुक्यातील इनायतपूर येथील अनाथ बहिणभावाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बालविकास, जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सांगितले.

राज्यमंत्री कडू यांनी इनायतपूर येथे अनाथ भावंडांच्या घरी भेट दिली व त्यांच्याशी संवाद साधला. इनायतपूर येथील राजेश सुधाकर धोंडे यांचे २०११ मध्ये आजाराने निधन झाले.त्यानंतर त्यांच्या पत्नी व दोन्ही मुलांच्या आई श्रीमती वैशाली राजेश धोंडे यांचे 16 मे 2021 रोजी कोरोना आजाराने निधन झाले. त्यामुळे जागृती राजेश धोंडे व सुशांत राजेश धोंडे ही बालके अनाथ झाली.या दोन्ही मुलांचा आजी व आजोबा सांभाळ करीत आहेत. तथापि, त्यांचे वय व परिस्थिती पाहता या भावंडांच्या संगोपनासाठी सर्व मदत केली जाईल, तसेच त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आपण उचलणार असल्याचे राज्यमंत्री कडू यांनी जाहीर केले.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांसाठी संगोपन योजनाही राबविण्यात येत आहे. त्याचा गरजू बालकांना लाभ मिळवून द्यावा, असेही निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. यावेळी प्रहारचे पदाधिकारी दिपक भोंगाडे,राहुल धोंडे,विष्णु घोम, पोलिस पाटील अमोल घोम,पोलिस पाटील जयश्री धोंडे,ग्रापं सदस्य उज्ज्वल धोंडे आदी उपस्थित होते.