राजू शेट्टींची मागणी; कृषी कायद्यांविरोधात ठराव राज्य सरकारने अधिवेशनात मांडावा


मुंबई – देशभरातील शेतकऱ्यांकडून सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

महाविकास आघाडीच्या सरकारच्या केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी बांधवांच्या भावना लक्षात आणून देण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली. यावेळी राजू शेट्टी यांनी पवारांकडे मुख्यमंत्र्यांबाबत तक्रार केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला वेळ देत नसल्याची खंत राजू शेट्टी यांनी पवारांकडे व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी शेट्टी यांना भेटीसाठी बोलावून घेतले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती, पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलेही उत्तर आले नसल्याचे राजू शेट्टी यांनी शरद पवार यांना सांगितले. त्यावर पवारांनी याविषयी जातीने लक्ष घालून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुमच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणू, असे आश्वासन शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना दिले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या आश्वासनानंतर संध्याकाळी शेट्टी यांना भेटीसाठी बोलावून घेतले. त्यानंतर राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकरी संघटनाशी चर्चा करूनच तीनही कृषी कायद्याच्या विरोधातील ठरावाबाबत पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे केली. यासंदर्भातील माहिती राजू शेट्टी यांनी ट्विट करुन दिली आहे.

येत्या अधिवेशनात राज्य सरकारने कृषी कायद्यातील सुधारणा करण्याचे विधेयक पारित करणार असल्याचे समजते, पण राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकरी संघटनाशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा व केंद्र सरकारने केलेल्या तीनही कृषी कायद्याच्या विरोधातील ठराव येणाऱ्या विधानसभेत करावे अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली. यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात, दादाजी भुसे, बाळासाहेब पाटील, कृषी,पणन,विधी व न्याय विभागाचे सचिव यांचेसह उपस्थित होते, असे शेट्टी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.