‘डेल्टा प्लस’बाबत सध्याच्या क्षणाला चिंता करण्याची आवश्यकता नाही – राजेश टोपे


मुंबई – कोरोनाची दुसरी लाट देशभरासह राज्यात ओसरताना दिसत आहे. पण असे जरी असले तरी अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत, त्याचबरोबर रूग्णांचे मृत्यू देखील सुरू आहेत. त्याचबरोबर कोरोना पाठोपाठ आज डेल्टा प्लस या नवीन आजाराने देखील डोकेवर काढले आहे. या संदर्भात सर्वसामान्यांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण देखील दिसत आहे.

आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलताना माहिती दिली. या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नसून आपण सध्या कोरोना नियमांचे पालन करून वागावे, एवढीच माझी सूचना राहील, असे टोपे म्हणाले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, डेल्टा प्लसच्या संदर्भात दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण साधारण १०० नमूने घेतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दर आठवड्याला २५ नमूने घेतो आणि अशा पद्धतीने प्रती महिना आपण डेल्टा प्लसच्या सॅम्पलचे होल जीनोम सिक्वेन्सिंग करतो. हे होल जीनोम सिक्वेन्सिंग आजपर्यंत जे ४ हजार लोकांचे झाले, त्यामध्ये २१ लोक डेल्टा प्लस पॉझिटव्ह आढळले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, पण बाकीचे सर्वजण बरे होऊ घरी परतले आहेत. त्यामुळे एकदम चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही.

डेल्टा प्लसच्या गुणधर्माविषयी अद्यापही स्पष्टता आलेली नाही. वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत, परंतु आपल्या हाती असलेल्या सध्याच्या आकडेवारीच्या माहितीप्रमाणे निश्चतच जो एक मृत्यू झालेला आहे. तो केवळ डेल्टा प्लसमुळेच झाला, असे म्हणता येणार नाही. त्यामध्ये ८० वर्ष वय, अन्य आजार होते, हे देखील कारणीभूत घटक आहेत. डेल्टा प्लसच्या संदर्भात एकूण देशभरात ४८ केसेस आहेत. त्यामुळे या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण सध्या कोरोना नियमांचे पालन करून वागावे, एवढीच माझी सूचना राहील, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

तसेच, दररोजची आरटीपीसीआरची क्षमता ही खऱ्या अर्थाने, पावणेदोन लाख- दोन लाखापर्यंत आहे आणि त्या क्षमतेपर्यंत आपण आपल्या तपासण्या दररोज घेतल्याच पाहिजेत, असे देखील आम्ही आरोग्य विभागावला सूचित केले आहे. केवळ आरोग्य विभागच नाही तर वैद्यकीय शिक्षण, महापालिकेचा जो भाग असेल त्यांना देखील सूचिक केले आहे की, तपासण्या अजिबात कमी करता कामा नये. कारण, चाचण्या कमी केल्यामुळे देखील थोड्याफार प्रमाणात दररोजच्या पॉझिटिव्ह असलेल्यांच्या संख्येवर परिणाम होत असतो. लोकांनी चाचण्यांसाठी देखील सहभाग घ्यावा. तपासणी, लसीकरण याचे आवाहन नागरिकांना आहे आणि याचबरोबर कोरोना नियमांचे पालन करून वागणे हा सर्वसामान्य मंत्र आहे, त्याचे पालन करावे, असे आवाहन देखील आरोग्यमंत्री टोपेंनी नागरिकांना यावेळी केले.

आता आपण सर्व जिल्ह्यांना थर्ड लेव्हलवर आणल्यामुळे आता थर्ड लेव्हलचे निर्बंध लागू आहेत. म्हणून प्रशासनाला आम्ही सूचित केलेले आहे, की कुठल्याही परिस्थितीत थर्ड लेव्हलची जी काही निर्बंध आहेत, ती पाळली गेली पाहिजेत. त्यामुळे प्रशानसन देखील त्याकडे लक्ष देईल व जनतेने देखील सहकार्य करावे, असे राजेश टोपे म्हणाले आहेत.