योगी सरकारचा भाजप कार्यकर्त्यांविरोधीतील ५००० खटले मागे घेण्याचा निर्णय


लखनौ – पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपने सुरुवात केली आहे. भाजपने निवडणुकीचा प्रचार सुरु होण्याआधी कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी राज्यातील मंत्र्यांना जिल्ह्यांमध्ये दौरे करुन भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राज्यात सत्तेत असणाऱ्या योगी सरकारने आणखीन एक निर्णय घेतला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात मागील सरकारच्या काळात दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपने घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत ५००० हजारहून अधिक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे टाईम्स नाऊने दिलेल्या आपल्या वृत्तात म्हटले आहे.

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीचे उत्तर प्रदेशात सरकार असताना आंदोलन आणि धरणे करणाऱ्यांविरोधात राजकीय हेतूने दाखल करण्यात आलेले तसेच खोटे आरोप करण्यात आलेले खटले मागे घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजप कार्यकर्त्यांवरोधात सपा आणि बसपाच्या कार्यकाळात दाखल केलेले ५००० हजारहून अधिक खटले मागे घेण्यात येणार आहेत. हे सर्व खटले जुलै महिन्यापर्यंत मागे घेण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. हा निर्णय भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष, उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष राधा मोहन सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीनंतर घेण्यात आला आहे.

राज्याचे गृहमंत्री ब्रिजेश पाठक यांनी यासंदर्भात बोलताना ही सामान्य प्रक्रिया आहे. हे खटले राजकीय हेतूने किंवा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आले होते. या सर्व खटल्यांचा अभ्यास करुन आम्ही असे खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने यापूर्वीही आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात आणि नेत्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी न्याय विभागकडून पाठिंबा मागितला होता. निवडणुकींचा प्रचार सुरु होण्याआधी कार्यकर्त्यांना समाधानी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

भाजपने येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा पंचायत अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये भाजप सहकारी पक्ष असणाऱ्या अपना दलसाठी जौनपुर आणि मिर्झापूरच्या जागा सोडू शकतात. केंद्रीय नेतृत्वाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर भाजपने अपना दलसाठी दोन जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्याऐवजी जिल्हा पंचायतींच्या अध्यक्षांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. भाजप ७३ जागा लढवणार तर अपना दल दोन जागी लढणार आहे.

उत्तर प्रदेशमधील राजकीय गणिताचा विचार करुन अपना दलला मंत्रीमंडळामध्ये फेरबदल करताना केंद्रात एखादे मंत्रीपद मिळू शकते अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. मोदी सरकारने आपल्या पहिल्या सरकारच्या कार्यकाळात अनुप्रिया पटेल यांना मंत्रीपद दिले होते. पण दुसऱ्या कार्यकाळात अपना दलला मंत्रीपद देण्यात आले नाही. मंत्रीमंडळ फेरबदलामध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अपना दलला खुश करण्यासाठी मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जाणकार सांगतात.