किरीट सोमय्यांनी केली अनिल परब, मिलिंद नार्वेकरांची सीबीआय चौकशीची मागणी


मुंबई – आज ईडीकडून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी छापेमारी केली आहे. भाजपने यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच, काही दिवसांत अनिल देशमुख यांना अटक होईल, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब यांची अवस्था होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्रकारपरिषद घेत यावरून किरीट सोमय्या यांनी जोरादार टीका केली. तसेच, अनिल परब, मिलिंद नार्वेकरांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी देखील किरीट सोमय्यांनी केली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंची देखील या पत्रकारपरिषदेस उपस्थिती होती.

किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, अनिल देशमुखांनंतर मिलिंद नार्वेकर व अनिल परब यांना पण त्याच वाटेवर जावे लागणार आहे. दापोली-मुरूड किनाऱ्यावर अनिल परब याच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर मिलिंद नार्वेकरांनी भव्य बंगला बांधण्यास सुरूवात केली आहे. या बंगल्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील साडेचारशे झाडं कापली. त्या जागेची किंमत आज १० कोटी आहे, दोन मजली बंगल्याचे बांधकाम सुरू आहे आणि बहुतेक त्याला मार्गदर्शन पर्यारवणमंत्री आदित्य ठाकरेंचे आहे. कोणत्याही प्राधिकरणाकडून परवानगी घेतलेली नाही. अनिल परब यांच्या बंगल्यावर मिलिंद नार्वेकर जात असतात व मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर अनिल परब जात असतात आणि या दोघांच्या बंगल्याची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे घेतात.


एवढे झाल्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही आणि हा बंगला केव्हा लॉकडाऊनच्या काळात उद्धव ठाकरेंचा उजवा हात अनिल परब रिसॉर्ट बांधत होते आणि उद्धव ठाकरेंचे डावे हात मिलिंद नार्वेकर भव्य बंगला बांधत होते. शिवसेना ही बंगलो पार्टी झाली असल्याचा आरोप देखील किरीट सोमय्यांनी केला आहे.

तसेच, अरबी समुद्राचा पश्चिम किनारा, कोकणच्या बाजूचे मुरूड म्हणजे दापोली मुरूड तिथे अनिल परब व मिलिंद नार्वेकर आणि अलिबागकडचे मुरूड तिथे उद्धव ठाकरे व रविंद्र वायकर. एका बाजुला उद्धव ठाकरे कागदावर १९ बंगलो उभे करतात, दुसऱ्या बाजुला मिलिंद नार्वेकर २५ कोटींचा बंगला बांधतात, तर तिसऱ्या बाजुला अनिल परब यांनी रिसॉर्ट तर बांधला, पण रिसॉर्टच्या बाजुला अनिल परब यांचा बंगला देखील आहे आणि म्हणून आमची मागणी आहे. उद्धव ठाकरे, रविंद्र वायकर, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांसाठी सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी यावेळी सोमय्यांनी केली.

दरम्यान छगन भुजबळांच्या मार्गावर अनिल देशमुख जात आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही छगन भुजबळांना तीन वर्षे तुरूंगात ठेवले होते. छगन भुजबळांनी १०० कोटी घोटाळ्याचे, महाराष्ट्र सदन आणखी घोटाळ्याचे पैसे कोलकात्याच्या कंपनींद्वारे स्वतःच्या परिवाराच्या कंपनीत वळवले होते. अनिल देशमुख यांनी देखील कोट्यावधी रुपये, मग ते वाझे वसुली गँग असो की अन्य घोटाळे असो, त्याचा पैसा कोलकात्याच्या कंपनीत वळवला.

कोलकात्याच्या कंपनीने देशमुख परिवारात आणि देशमुख परिवाराने त्या पैशांनी मोठे उद्योग, राज्य बांधण्या ऐवजी इमारत बांधण्याची सुरूवात केली. ज्यांनी काळ्याचे पांढरे केले, त्याच सीए व बोगस कंपन्यांनी मान्य केले की कॅश देऊन चेक देत होते. त्यामुळे अनिल देशमुख आता केव्हा जेलमध्ये जाणार याची उत्कंठता व प्रतीक्षा राज्यातील जनतेला असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.