ठाकरे सरकारच्या धरसोड वृत्तीवर देवेंद्र फडणवीसांनी सोडले टीकेचे बाण


मुंबई – महाविकास आघाडी सरकारवर विधानसभा विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकेची झोड उठवली असून त्यांनी सरकारच्या धरसोड वृत्तीवर टीकेचे बाण सोडले. त्यांनी यावेळी सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचेही निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचारावरही बोट ठेवले. तसेच महाराष्ट्रात मृत्यूचे मॉडेल होते, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्र मुंबई बाहेरही असल्याकडेही लक्ष वेधत सरकारला धारेवर धरले.

याला सरकार म्हणता येईल का? आपल्या विभागाचे मंत्री राजे झाले आहेत. प्रत्येक विभागात एक एक वाझे..ही अवस्था महाराष्ट्राची आपल्याला पाहायला मिळते. जेवढा भ्रष्टाचार गेल्या ६० वर्षात बघितला नाही, तेवढा आता दिसत आहे. एक मुख्यमंत्री कुठल्याही सरकारला असतो. या सरकारमधील मंत्रीही स्वतःला मुख्यमंत्री समजतो. राज्यमंत्रीही स्वतःला मुख्यमंत्री समजतो. रोज निर्णय होतात. एका तासात स्थगित होतात. दुसऱ्या दिवशी रद्द होतात. तिसऱ्या दिवशी पुन्हा घेतले जातात. सरकार आहे, की सर्कस आहे?, अशा प्रकारचा प्रश्न पडवा अशी अवस्था असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कोरोनाकाळात महाराष्ट्राची काय अवस्था झाली. कोरोनाच्या संकटकाळात सरकारने चांगले काम केले, असे मंत्री आणि काही माध्यमे सांगतात. तेव्हा त्यांना एवढेच सांगावसे वाटते. तुमचे डोके ठिकाणावर आहे का?. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात होते. किड्या मुंग्यासारखे लोके मेली. कुठले मॉडेल आणले आहे. यशाचं मॉडेल आणले आहे. मॉडेल जर असेल तर मृत्यूच्या सापळ्याचे मॉडेल आहे. या मृत्यूंचे उत्तर कोण देईल? उत्तर प्रदेशाच्या गंगा नदीत ५० मृतदेह सापडले. तर दोन दिवस महाराष्ट्रात बातम्या चालतात. बीड जिल्ह्यात २२ मृतदेह कोंबून एका गाडीत त्याची विटंबना केली जाते. त्या संदर्भात काही लोक मात्र मौन आहेत. बोलत देखील नाहीत. हे मॉडेल आहे. कोरोना काळातील महाराष्ट्र मॉडेलवरही देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले.

आपल्याला पोलीस विभागातला वाझे सापडला. वेगवेगळ्या विभागतील वाझे अजून बाकी आहेत. त्यांचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे. तो पत्ता आमच्याकडे असल्यामुळेच अधिवेशन दोन दिवसांचे ठेवले. पुरवण्या मागण्यांशिवाय दुसऱ्या विषयांवर चर्चा करता येणार नाही. कुठल्याही वाझेंचा पत्ता सांगता येणार नसल्याचा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.