मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना घाईघाईने निर्बंध शिथिल न करण्याच्या सूचना


मुंबई – कोरोनाची दुसरी लाट अद्याप गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. तसेच डेल्टा प्लसचा धोकासुद्धा आहे हे सगळे लक्षात घेऊन पुढच्या काळातील आरोग्य सुविधांबद्दल आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचे शेपूट अद्यापही बाकी आहे. त्यातून आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ( लेव्हल्स) ठरवल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे.

नागरिक लेव्हल्सचा आधार घेऊन मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा यादृष्टीने नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

वैद्यकीय सुविधांबद्दल मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, विशेषतः दुसऱ्या लाटेत आपण ऑक्सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध राहील हे पहा. आपल्याला बऱ्याच ठिकाणी फाईल्स रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील त्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा.

टास्क फोर्सच्या सदस्यांनी सातत्याने संसर्ग वाढणाऱ्या सात जिल्ह्याबद्दल बोलताना सांगितले की, या सातही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. या कोरोनाची लक्षणेही बदलत आहेत. लसीकरणाविषयी नागरिकांच्या मनातील भ्रामक कल्पना व समजुती दूर करुन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. प्रसंगी अधिक कडक निर्बंधही लावावे लागणार आहेत.

याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी आपआपल्या जिल्ह्यात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली, तसेच फिरत्या प्रयोगशाळा पुरविण्याची विनंती केली तसेच गावोगावी कोरोनमुक्तीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर ०. १५ इतका कमी झाला आहे.

पण या सातही जिल्ह्यांचा दर त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट आहे. रत्नागिरीत पहिल्या लाटेत ३०७४ रुग्ण तर दुसऱ्या लाटेत ५६०० रुग्ण, सिंधुदुर्गात पहिल्या लाटेत १३४६ तर सध्या ५५०० , हिंगोलीत पहिल्या लाटेत ६६० तर दुसऱ्या लाटेत ६७५ रुग्ण आढळले असून ही वाढ सावध करणारी आहे असं आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितले.