रामपंचायतींना पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता


मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांची पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यात सध्या कोरोना परिस्थितीमुळे ग्रामीण भागात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके अदा न झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सद्य परिस्थिती पाहता पंधराव्या वित्त आयोगाच्या अबंधित (Untied) अनुदानातुन पथदिव्याची देयके आणि बंधित (Tied) अनुदानातुन पाणीपुरवठा योजनांची देयके अदा करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकान्वये मान्यता देण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीने त्यांना प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पथदिव्याची आणि पाणीपुरवठा योजनांची देयके अदा करावयाची आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळणार असून देयकांच्या पूर्ततेअभावी कोणत्याही गावात पथदिव्यांची वीज किंवा पाणीपुरवठा योजना खंडीत होणार नाही, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.