आपत्ती काळात प्रत्येक गावामध्ये आपत्ती प्रतिसाद कृती दल कार्यरत ठेवा – जयंत पाटील


सांगली : आपत्तीच्या काळात नागरिकांनी सहकार्य करावे सांगलीकरांच्या कोणत्याही संकटाच्या वेळी आम्ही सदैव धावून येऊ त्या दृष्टिकोनातून हरिदास पाटील यांनी तरुण मराठा बोट क्लब, सांगलीवाडी यांच्यामार्फत आज जयंत रेस्क्यू टीम उभी केले हे कौतुकास्पद आहे, आपत्ती काळत प्रत्येक गावामध्ये आपत्ती प्रतिसाद कृती दल कार्यरत ठेवावे असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

तरुण मराठा बोट क्लब, सांगलीवाडी यांच्यामार्फत शंकरघाट, सांगलीवाडी येथे जयंत रेस्क्यू फोर्सचे उद्घाटन व फायबर बोटी प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री जयंत पाटील म्हणाले, पावसाळ्याची सुरुवात चांगली झाली आहे, कोल्हापूर जिल्ह्यातही चांगला पाऊस पडला आहे. तसेच धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला आहे. पुराची पातळी मर्यादेत ठेवणे आणि मर्यादेपेक्षा जास्त पाऊस झाला तर कोणत्या उपाययोजना करता येतील, कोणते क्षेत्र पाण्याखाली जाईल.

नदीची पातळी आयर्विन पुलाजवळ किती झाल्यावर कोणता भाग पाण्याखाली जातो याची व्यवस्थित माहिती असलेली अत्यंत सुंदर आणि उदबोधक पावसाळा 2021 आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली ही पुस्तिका महानगरपालिकेने काढली आहे. त्याबद्दल त्यांचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी अभिनंदन केले.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांना भेटून आलमट्टी धरणातून करावयाचा विसर्ग याबाबत समन्वयासाठी चर्चा झाली आहे. यातून दोन्ही राज्यातील जनतेला पुराच्या काळात कमीत कमी त्रास होईल यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रामध्ये कृष्णा खोऱ्यात विशेषत: जे पाणी कृष्णा नदीत येते त्या पाण्याचा वस्तुनिष्ठ अंदाज घेण्यासाठी ठिकठिकाणी पर्जन्यमापक केंद्रे उभारली आहेत. त्यामुळे एक दोन तासात पाण्याचा अंदाज येऊन पाणी पातळी किती वाढेल याचा अंदाज घेता येतो व त्या अनुषंगाने विविध उपाययोजना, लोकांना वेळीच वस्तुनिष्ठ माहिती मिळावी यासाठी आरटीडीएस यंत्रणेचा उपयोग होते.

याच प्रकारची यंत्रणा कर्नाटकामध्येही बसविण्याबाबत कर्नाटक सरकारला विनंती करण्यात आली आहे. ही विनंती त्यांनी मान्यही केली आहे. त्यामुळे यावेळी कर्नाटक सरकारशी अधिक चांगला समन्वय राहील व सांगलीकरांना कमीत कमी त्रास होईल. तसेच गत दीड दोन वर्षामध्ये यंत्रणेत बऱ्याच सुधारणा केल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी आपत्ती काळासाठी उपयुक्त फायबर बोट, लाईफ जॉकेट व इतर साहित्य दिल्याबद्दल तरुण मराठा बोट क्लब व इतर देणगीदारांचे आभार मानले.