जळगावच्या केळींना मिळाले जीआय मानांकन; बाराशे कंटेनर केळी वर्षभरात आखाती देशात निर्यात


जळगाव : जीआय मानांकन जळगावच्या केळींना मिळाल्यानंतर गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील बाराशे कंटेनर केळी ही आखाती देशात निर्यात करण्यात आली आहेत. जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही खरी सुवर्ण संधी ठरली आहे.

जळगावची केळी केवळ देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याला कारण म्हणजे, येथील केळींना असलेली विशिष्ट प्रकारची चव, त्यांची टिकण्याची क्षमता आणि त्यांच्यात असलेली पोषण मूल्य याचा विचार करता जळगाव जिल्ह्यातील केळींनी आपली नवी ओळख निर्माण केली आहे.

आपल्या वेगळेपणासाठीच जळगाव जिल्ह्यातील केळींना जीआय मानांकन मिळाल्यामुळे केवळ भारतात नव्हे तर जागतिक पातळीवर देखील जळगावच्या केळींची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षभरात जळगाव जिह्यातील बाराशे कंटेनर केळी ही आखाती देशात निर्यात झाली आहेत. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना त्याचा परिणाम म्हणून भरघोस आर्थिक फायदा होताना दिसत आहे. पूर्वीच्या दरापेक्षा किलो मागे दोन ते तीन रुपये अधिकचे मिळत असल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आनंदी आहेत.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील तांडळवाडी गावातील निसर्गराजा शेतकरी मंडळाने यामध्ये प्रामुख्याने पुढाकार घेतला असून त्याला शासनाच्या कृषी विभागाने आणि अपेडाने प्रोत्साहन दिल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीची दारे खुली झाली आहेत. भारताचा विचार केला तर जवळपास सहाशे कोटी रुपयांची केळींची निर्यात ही जगभरात होत असते. त्यात जळगाव जिल्ह्याचा सव्वा दोनशे कोटी रुपयांचा वाटा आहे. यावरून जळगाव जिल्ह्याच्या केळी उत्पादकांच्या मेहनतीचा अंदाज घेता येऊ शकतो.

जळगाव जिल्ह्यातील केळी पूर्वी दर्जेदार असली तरी ती विदेशात निर्यात करण्यात अनेक अडचणी असल्यामुळे त्याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नव्हता. पण आता शासन आणि शेतकरी यांच्यात चांगला समन्वय निर्माण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी केळी उत्पादन करण्याचे तंत्र अवगत केल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसागणिक अनेक शेतकरी केळी उत्पादनाकडे वळत असल्यामुळे आगामी काळात जळगाव जिल्ह्यातील केळ्यांना सोन्याचे दिवस येण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.

गेल्या काही वर्षांचा विचार केला तर केळी उत्पादन तंत्र हे चांगल्या प्रकारे विकसित झाल्यामुळे जगभरात विविध ठिकाणी केळी उत्पादन हे केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या केळी या एकाच प्रकारच्या मोजल्या जात असल्यामुळे जळगावच्या दर्जेदार केळीला त्याचा फारसा फायदा होताना दिसत नव्हता.

पण शेतकरी आणि शासनाच्या पुढाकारातून जळगावच्या केळीला तिच्यामधील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या गुणांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त असलेले जीआय मानांकन मिळाल्याने जळगाव केळींचा एक ब्रँड तयार झाला आहे. या ब्रँडला चांगली मागणी निर्माण झाली आहे. जीआय मानांकन असलेल्या केळीला जगभरात जवळपास दहा हजार मेट्रिक टन एवढी वर्ष भरासाठी मागणी आहे. पण त्या तुलनेत पुरवठा मात्र अतिशय कमी असल्यामुळे, केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगली संधी असल्याचे मत केळी उत्पादक शेतकरी आणि महाजन बनांना निर्यातदार प्रशांत महाजन आणि सदानंद महाजन यांनी म्हटले आहे.