क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाचे पुनर्गठन करण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश


मुंबई : राज्यातील मातंग समाजाचे मागासलेपण ओळखून, त्यांच्या प्रश्न व समस्यांचा अभ्यास करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक योजना आखण्यासाठी 2003 मध्ये नेमण्यात आलेल्या क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाचे पुनर्गठन करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

2003 मध्ये नेमलेल्या या आयोगाला 2008 मध्ये मूर्त स्वरूप प्राप्त झाले. या आयोगाने सुचवलेल्या 82 शिफारशीपैकी एकही शिफारस प्रत्यक्षात अंमलात आणली गेली नाही. म्हणून या आयोगाचे पुनर्गठन करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले असून, या अभ्यास आयोगाने आपला अहवाल एक वर्षात सादर करावा असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निर्देशित केले आहे.

मातंग समाजाचे विविध प्रश्न व मागण्यांसंदर्भात मंत्रालयात डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे संचालक अनिल अहिरे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, मा.आ. राजीव आवळे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे विजय डाकले, बाळासाहेब भांडे, प्रधान सचिव श्याम तागडे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, रवींद्र खेबुडकर यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारक उभारणीस गती देणार
मुंबईतील घाटकोपर येथील चिरागनगर भागात एस आर ए व म्हाडाच्या संयुक्त विद्यमाने राज्य सरकारच्या माध्यमातुन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीचे काम सुरू आहे. या कामाचा काही दिवसातच एक स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल तसेच या कामास गती देण्यात येईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारला विनंती केलेली असून, येणाऱ्या अधिवेशन काळात याबाबतचा ठराव करून केंद्र सरकारकडे पाठविण्याचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती मुंडे यांनी यावेळी दिली.

क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारक उभारणीतील अडसर दूर करणार
पुण्यातील क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारक उभारणीच्या कामात भूसंपादन व अन्य अडचणी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मदतीने स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून दूर करण्यात येतील व या स्मारकाच्या उभारणीच्या कामास गती देण्यात येईल असेही मुंडे यांनी सांगितले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून कर्जमर्यादा 5 लाखांपर्यंत करण्यासाठी प्रयत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी देण्यात येणारी कर्जमर्यादा 5 लाखांपर्यंत वाढविण्यात यावी तसेच समाजातील कृषी विभागाचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कृषी केंद्र उभारणीसाठी अर्थसहाय्य देण्यात यावे याबाबत वित्त विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुंडे यांनी दिली.

स्टॅण्ड अप इंडिया कार्यक्रमांतर्गत उद्योग उभारणीसाठी प्रयत्नशील असलेल्या समाजातील तरुणांना एका विशिष्ट बिझनेस मॉड्युल अंतर्गत अर्थसहाय्य मिळावे याबाबतचे एक धोरण आखण्यात येत असून कोविड विषयक निर्बंध जसजसे कमी होत जातील, त्यानुसार ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुंडे यांनी सांगितले.

2003 मध्ये नेमण्यात आलेल्या क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाचे पुनर्गठन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आल्यामुळे मातंग समाजातील गावकुसावरचे प्रश्न, समस्या व समाजाची सद्यस्थिती सरकारला अवगत होईल व या आयोगाच्या शिफारसी नुसार नवीन कल्याणकारी योजना आखता येतील. यादृष्टीने आयोगाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय मुंडे यांनी जाहीर केल्याबद्दल बैठकीस उपस्थित सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना आदींनी धनंजय मुंडे यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.