मराठा आरक्षणाच्या मुद्यावर छत्रपती शाहू महाराजांनी मांडले मत; हा विषय केंद्राने मनावर घेतला आणि आपल्या बाजूने मांडायचे ठरवले तरच हा प्रश्न सुटू शकतो


कोल्हापूर – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत नेला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. हा विषय केंद्राने मनावर घेतला आणि आपल्या बाजूने मांडायचे ठरवले तरच हा प्रश्न सुटू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रश्नी मोदींनी सकारात्मकता दाखवली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी म्हटले असले तरी अद्यापही त्यांचे काय विचार आहेत ते समजलेले नसल्याचे यावेळी त्यांनी म्हटले. छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात झाली आहे. यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधानांपर्यंत हा विषय नेला पाहिजे. त्यांच्यासमोर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांनी विषय मांडला आहे. पंतप्रधान सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले असले तरी अद्याप त्यांचे याबाबत काय विचार आहेत हे कळालेले नाही. ते स्पष्ट झाले तर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात येईल. बहुमत असल्यामुळे त्यांच्याकडे जाऊन सोबत येण्यासाठी विनंती केली पाहिजे, असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.

हा विषय केंद्राने मनावर घेतला आणि आपल्या बाजूने मांडायचे ठरवले तरच हा प्रश्न सुटू शकतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कायद्यात आतापर्यंत एवढे बदल झालेले, असताना आणखी एक बदल करण्यास काय अडचण आहे ? अशी विचारणा करताना मनात आणले तर सगळे होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

हा विषय महाराष्ट्रातील आमदार, खासदारांनी एकत्र येऊन दिल्लीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. तो कसा न्यायचा यावर विचार केला पाहिजे. दिल्लीत संभाजीराजेंना पोहोचवण्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. एकट्यावरच जबाबदारी टाकणे आणि त्याने सर्व करणे अशक्य असल्यामुळे खासदार आणि मंत्रीमंडळाने दिल्लीत विषय पोहोचवला पाहिजे. तसेच फक्त मोदींकडे विषय मांडून चालणार नाही. पंतप्रधान म्हणतील मी काय करु, बाकीच्यांचे मत काय माहिती नाही, असे चालणार नाही. बहुमतासाठी लॉबिंग करावेच लागेल, असेही ते म्हणाले आहेत.

५८ मूक मोर्चे आणि मुंबईतील भव्य मोर्चा गेल्या काही वर्षात शांततेने पार पडले. मी जनतेमध्ये, समाजात नाराजी असल्याचे पाहत होतो. एकमुखाने विषय हाताळण्यापेक्षा एकमेकांच्या विरोधात बोलण्याचे, तसेच दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु होते. रायगडावरुन संभाजीराजेंनी गर्जना केल्यानंतर, आम्ही त्यांना भूमिका थोडी बदलली पाहिजे, सौम्य पद्धतीने आणि सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले पाहिजे, असे सांगितले. महाराष्ट्राने एकमुखाने पुढे गेले पाहिजे याच दृष्टीकोनातून हे मूक आंदोलन करण्यात आले, असे ते म्हणाले.

भेटीदरम्यान मांडण्यात आलेले मुद्दे रास्त असून योग्य विचार करु, असे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. आपल्यासोबत राज्य सरकार असणार आहे, यात मला शंका वाटत नसल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट करताना सगळेच मिळेल अशी अपेक्षा करु नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. जे शक्य आहे आणि योग्य आहे ते जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर मिळणे हा मुख्य प्रश्न असल्याचे ते म्हणाले आहेत.