शिवसेना भवनासमोरील राड्यानंतर आशिष शेलार यांचा घणाघात; अखेर शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवलीच


मुंबई – मुंबईत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनसमोर जबरदस्त हाणामारी झाली आहे. शिवसेनेकडून राम मंदिरावरुन करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी माहीम पोलीस स्टेशनला पोहचल्यानंतर या प्रकरणावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, या आंदोलनानंतर आंदोलक अटक होऊन गेल्यानंतर लपूनछपून, पोलिसांच्या आड राहून एका महिलेवर हल्ला करणे, म्हणजे शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवलेली आहे.

शेलार यावेळी म्हणाले, सोनिया गांधी, रॉबर्ट वढेरा ज्यावेळी आपले देव बनतात, त्यावेळी शिवसेनेचे तेंडुलकर, साठे आणि आंबेडकर हे दुष्मन होतात. आज या ठिकाणी हे दिसल्यामुळे या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पोलिसांच्या आड लपून राहून हल्ले कसले करता? मैदानात समोर या, तुम्हाला चारही मुंड्या चीत करायला भाजप तयार असल्यामुळे या भ्याड हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे.

एक महिला अक्षदा तेंडुलकर नावाची महिला, तिच्यावर सर्वांनी मिळून हल्ला करणे, शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. याचे उत्तर … हिंदीत एक म्हण आहे, लातो के भूत बातो से नही मानते.. इसके आगे बातोंसे नही चलेंगे उनको उनकी भाषां में ही जवाब देंगे..असे शेलार यांनी म्हटले आहे.

पोलिसांना मी व मंगलप्रभात लोढा आम्ही सगळेजण भेटलो आहोत. निष्पक्षपणे पोलिसांनी काम करावे ही अपेक्षा आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. पोलीस आज आम्हाला म्हणाले आहेत की, गुन्हा दाखल करत आहोत. तो गुन्हा दाखल केला नाही, तर हे आंदोलन अजून वाढेल, पोलिसांनी तसे आश्वासित आम्हाला केले आहे. पण आम्हाला अजूनही एक कारण कळत नाही की, राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेच्या पोटात का दुखत आहे? देखो दिवानो ऐसा काम न करो, राम का नाम बदनाम ना करो.

राम मंदिराच्या विषयात शिवसेना पहिल्या दिवसापासून पहिले मंदिर नंतर सरकार म्हणत होती, पण आता मंदिर विसरले. त्यानंतर आम्ही समर्पण निधी गोळा करण्याचा कार्यक्रम केला. त्याला लोकवर्गणी करून बदनाम करण्याचे अग्रलेख त्यांनी लिहिले आणि ज्या समर्पण निधीतून, पारदर्शक पद्धतीने आज कारभार सुरू आहे. त्यावेळी राम मंदिराच्या निर्मितीला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. ही लोके रामाला बदनाम करण्याचे व राम मंदिराला बदनाम करण्याचं षडयंत्र जे करत आहेत, हे पाप जनतेने पाहिले आहे.