महाराष्ट्राने आत्मनिर्भर व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे हीच मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा – राजेश टोपे


पुणे – राज्यातील अनेक साखर कारखाने शरद पवारांच्या आवाहनानंतर ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढे येत असून आपले राज्य आत्मनिर्भर व्हावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, तसेच इतर राज्यापुढे हात पसरवण्याची वेळ येऊ नये अशी मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीआधी राजेश टोपेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

माझी आशा वर्करबाबत युनिअनसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर असल्यामुळे ते आंदोलन करणार नाहीत. तरीदेखील ते आंदोलन करणार असतील, तर ते चुकीचे आहे. आशा वर्करबाबत मुख्यमंत्री यांच्या सोबतचर्चा करून प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन राजेश टोपे यांनी यावेळी दिले.

केंद्राच्या कायद्यात जोपर्यंत बदल होत नाही, तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकत नाही. त्यांनी बदल करावा, आपण तो स्विकारण्यास तयार आहोत. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिले पाहिजे. हीच अपेक्षा महाविकास आघाडी सरकारची असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सिंधुदूर्ग, रायगड, कोल्हापूर आणि सातारा येथे पाच टक्क्यांपेक्षा जास्त दर आहे. त्या ठिकाणी आमचे लक्ष असून लवकरच तेथील परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

अधिकाधिक लस केंद्राने उपलब्ध करुन द्यावी. आतापर्यंत आपण तीन कोटी नागरिकांचे लसीकरण केले आहे, १३ कोटी लसीकरण करणे बाकी आहे. उर्वरित राहिलेले लसीकरण देखील तीन ते चार महिन्यात पूर्ण करू. पण आपल्याला केंद्र सरकारने सहकार्य करण्याची अपेक्षा असल्याचेही राजेश टोपेंनी म्हटले आहे.

राज्य सरकाराच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत १३३ रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारावरील रुग्णांवर उपचार मोफत केले जात आहेत. त्या आजारासाठी एमफोटेरिसिन इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. जे खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्याकडून रुग्णालयाने इंजेक्शनसाठी जादा पैसे घेऊ नये, अशी सूचना राजेश टोपेंनी यावेळी केली.