…तर कोल्हापुरातील निर्बंध अजून कठोर करावे लागतील; अजित पवार


कोल्हापूर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथील करणार नाही. उलट नियम पाळले जात नसतील, तर निर्बंध अधिक कडक करण्यात येतील, असा इशारा दिला आहे. आपल्या जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी कोल्हापूरवासियांना केले आहे. कोल्हापुरात आज अजित पवार यांनी कोरोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोल्हापूर निर्बधांच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील पॉझिटिव्हीचे सर्वात जास्त प्रमाण कोल्हापुरात आहे. यामुळे येथील निर्बंध अजिबात शिथील केले जाणार नाहीत. उलट कोणी नियम पाळत नसतील, तर निर्बंध अधिक कडक केले जातील. आम्ही निर्बंध लादण्यासाठी येत नाही. पण या संकटातून कोल्हापूरने लवकरात बाहेर पडावे, यासाठी थोडा वेळ सोसावे लागणार आहे. मी सकाळी अनेकांना मास्कविना पाहिले. काही जण मास्कऐजी रुमाल वापरतात आणि पोलीस दिसले की तो रुमाल लावतात, असे करु नका, तुम्ही आपले आरोग्य धोक्यात घालत आहात, निष्पापांनाही याचा फटका बसत आहे. निर्बंधांची पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांना कडकपणे अंमलबजावणी करण्यास सांगितल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

सध्या महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोल्हापुरात कोरोनाबाधितांचे प्रमाण जास्त आहे. याबाबतीत कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या लाटेत काम उत्तम झाले होते. पण सध्या कोरोना आटोक्यात नाही, त्याची काय कारणे आहेत. औषध, लसींचे परिस्थिती याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. लोकप्रतिनीधांशी चर्चादेखील केली. आज या दौऱ्यात येत असताना गृह विलगीकरण कमी करुन संस्थात्मक विलगीकरण झाले पाहिजे यावर भर दिला. फायर, ऑक्सिजन ऑडिट सुरु आहे. लहान मुलांसाठी टास्क फोर्स सुरु करण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

काही त्रुटी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागात दिसल्या का असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केला. आपल्याला त्यांच्याकडूनच काम करुन घ्यायचे असल्यामुळे त्यांना नाउमेद करुन चालणार नाही. म्हणूनच त्यांना काय अडचणी आहेत, ते सागंण्यास सांगितले आहे. आम्ही सुविधा देतो, पण पहिल्या लाटेत केले तसे आक्रमकपणे काम आत्ता काम केले पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनीही सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असेही सांगितले आहे. तरीही फरक पडला नाही तर ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी पार पाडली नाही, तर कठोर निर्णय घ्यावे लागतील.

कोरोना चाचण्या दीड ते दुप्पटीने वाढल्या पाहिजे, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. चाचणीनंतर रुग्णसंख्या सुरुवातीला वाढली, तरी चालेल पण नंतर ते कमी होईल. चाचण्या न झाल्यामुळे लोक बाहेर फिरत असतात, त्यामुळे इतरांनाही संसर्ग होतो, त्यामुळे चाचण्या वाढवणे गरजेचे असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले, दरम्यान खासगी रुग्णालयांनी नियमाप्रमाणे बिले आकारावीत, कारण नसताना जास्त बिल लावू नये अशी सूचनाही दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

पावसाळी अधिवेशन ५ जुलैला असून पुरवणी मागण्या घेतल्या जातील. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा मुद्दा घेणार असून ते लवकरात लवकर दिले जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले. तसेच सिरम आणि भारत बायोटेकने लसनिर्मिती वाढवली असून १५ जूननंतर किंवा १ जुलैनंतर लस मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्यातील निवडणुकीबाबतचा अंतिम अधिकार आहे. त्यामुळे कोणी काही विधान करत असेल तर त्याला महत्त्व नसल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवण्याचे विधान करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मताला त्यांनी महत्त्व नसल्याचे अधोरेखित केले.

कोरोना वैद्यकीय साहित्यामध्ये जीएसटी मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर सवलत मिळाली, असा उल्लेख करुन पवार म्हणाले केंद्र शासनाकडून जीएसटीचा परतावा राज्याला २३ हजार कोटी रुपये मिळणे बाकी आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आम्ही मंत्रिमंडळात असल्याने खरी आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध आहे. केंद्र सरकारने जीएसटीची रक्कम दिली असताना राज्य सरकारने ओरड करू नये, असे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे हे अज्ञानातून आलेले आहे. त्यांना वास्तवातील आकडेवारी माहीत नसल्याने ते काहीही बोलतात. विनाशकाले विपरीत बुद्धि अशी त्यांची अवस्था झाल्याचा टोला त्यांनी लगावला.