काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे ठाकरे सरकारचा इशारा


पुणे – राज्यांमधील काही भागात कोरोनाचा संसर्गदर आणि रुग्णसंख्या घटल्यामुळे निर्बंध कमी करत दिलासा देण्यात आला आहे. नागपूर, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्य़ात लागू असलेले सर्व निर्बंध रद्द करण्यात आले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत असतानाच दूसरीकडे काही ठिकाणी मात्र रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लावण्याचा इशारा पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

रविवारच्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनामुक्त बरे होण्याचे प्रमाण कमी आणि रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. सरकारने सवलत दिल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या धीम्या गतीने वाढत आहे. जर संख्या अजून वाढली तर अनेक ठिकाणी निर्बंध नव्याने लावावे लागतील. पुढील आठ दिवसातील परिस्थिती पाहून यासंबंधातील निर्णय घेतला जाईल, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

दर आठवडय़ाला कोरोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण, खाटांची उपलब्धता आणि संसर्गदर या आधारे निर्बंध शिथिलीकरणाचे निकष बदलण्यात येतात. २० जिल्ह्य़ांमधील निर्बंध सोमवारपासून पूर्णपणे शिथिल होतील किंवा ते अंशत: शिथिल होतील. मुंबई शहराचा समावेश दुसऱ्या टप्प्यात झाल्यामुळे निर्बंध कमी होणे अपेक्षित होते, पण गर्दी टाळण्यासाठी तसेच अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई शहराला तिसऱ्या टप्प्यातच ठेवण्यात आले आहे. परिणामी, गेल्या आठवडय़ाप्रमाणेच मुंबईत निर्बंध कायम राहतील आणि दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच खुली राहतील. पुणे शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह अन्य दुकाने आज, सोमवारपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यात ठाणे जिल्ह्य़ाचा ग्रामीण भाग, अकोला, औरंगाबाद, बीड, गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद, सांगली या आठ जिल्ह्य़ांचा समावेश झाला आहे. तिथे सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत दुकाने खुली राहतील. याशिवाय अन्य निर्बंध लागू असतील. शनिवार-रविवारी दुकाने बंद राहतील. गर्दी टाळण्याकरिता मुंबई शहराचा याच गटात महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी समावेश केला आहे. मुंबईतील जोखीम टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

तिसऱ्या टप्प्यात मुंबई शहराचा समावेश करण्यात आल्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेचा वापर करता येईल. या आठवडय़ात सर्वसामान्यांना रेल्वे सेवेचा वापर करता येणार नाही. रुग्णसंख्या आणखी कमी होईपर्यंत या महिन्यात तरी सर्वसामान्यांना रेल्वे सेवेचा वापर करण्याची मुभा दिली जाणार नाही, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.