कोरोनामुक्त गाव अभियानात सहभाग घ्या – बाळासाहेब थोरात


अहमदनगर – राज्यातील शहरी भागातील कोरोना आटोक्यात येत असून ग्रामीण भागात कोरोना रुग्णवाढ पूर्णपणे रोखण्यासाठी सर्व गावांतील नागरिकांनी पुढाकार घेत राज्य शासनाने सुरू केलेल्या कोरोनामुक्त गाव अभियानात सहभाग घ्यावा व लवकरात लवकर आपले गाव, तालुका, जिल्हा व राज्य पूर्णपणे कोरोनामुक्त करण्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर आयोजित विविध गावांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षीही आणि यावर्षीच्या दुसऱ्या लाटेतही अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. महाराष्ट्राने केलेल्या कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मी जबाबदार या अभियानांतर्गत गावोगावी नागरिकांची तपासणी झाली.

मोठ्या प्रमाणावर तपासणीमुळे रुग्णसंख्या काही काळ वाढलेली दिसली मात्र यातून त्या नागरिकांवर तातडीने उपचार करणे शक्य झाले. यामध्ये नागरिकांचेही मोठे सहकार्य लाभले आहे. कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. त्याला पूर्णपणे घालविण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर काहीशी वाढणारी गर्दी अत्यंत चिंताजनक आहे. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. म्हणून प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करा. नेहमीच मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सींगचे पालन करा व कोणत्याही आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या.

याचबरोबर आपले कुटुंब,आपले गाव पूर्ण कोरोनामुक्त करण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या कोरोनामुक्त गाव अभियानात प्रत्येक गावांनी सहभाग घ्यावा. यामुळे प्रत्येक गाव कोरोनामुक्त होऊन आपला तालुका कोरोनामुक्त होईल. त्यानंतर जिल्हा, राज्य व आपला देश ही कोरोनामुक्त होईल. या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेताना या अभियानात प्रत्येकाने सक्रिय पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यात व संगमनेर तालुक्यात प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. हे कोरोनाचे संकट आपल्याला पूर्णपणे घालवायचे आहे. यासाठी नागरिकांनी कायम सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाने सुरू केलेल्या कोरोनामुक्त गाव अभियानामध्ये आपण सक्रीय सहभाग घ्या. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून यामध्ये १७१ गावांपैकी ८१ गावे कोरोनामुक्त झाली असून ३१ गावे लवकरच कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. ही आनंदाची बाब आहे मात्र संपूर्ण तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे असेही ते म्हणाले. यावेळी गावच्या प्रतिनिधींनी गावांतील कोराना उपाययोजनांबाबतची माहिती दिली.