Article 370 संदर्भात दिग्विजय सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद


नवी दिल्ली – केंद्र सरकारने ऑगस्ट २०१९मध्ये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेचे कलम ३७० हटवल्यानंतर दीड वर्ष उलटूनही हा मुद्दा असूनही भाजप-काँग्रेस आणि भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये वादाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नुकतेच कलम ३७० संदर्भात केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आले असून त्यावर सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे.

एका पाकिस्तानी पत्रकाराशी क्लबहाऊस या अॅपमधील लाईव्ह चर्चेमध्ये बोलताना दिग्विजय सिंह यांनी हे वक्तव्य केले होते. सध्या सोशल मीडियावर याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यावरून भाजपकडून आता दिग्विजय सिंह आणि काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली आहे.


Clubhouse या अॅप्लिकेशनवरील एका चर्चासत्रात काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सहभाग घेतला होता. सध्या या चर्चेमधील एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये, शाहजेब गिलानी नावाच्या जर्मनीमध्ये राहणाऱ्या एका पाकिस्तानी पत्रकारासोबत ते चर्चा करत होते. यावेळी कलम ३७० च्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना काँग्रेस सत्तेत आल्यास कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचा नक्कीच पुनर्विचार करू, असे वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केले होते.

क्लबहाऊसमधील ही ऑडिओ क्लिप ट्विटरवर भाजपचे कर्नाटकमधील आमदार गिरीराज सिंह यांनी ही शेअर केली आहे. तसेच, यासोबतच काँग्रेसचे पहिले प्रेम पाकिस्तान आहे. दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींचा संदेश पाकिस्तानला दिला आहे. काश्मीर बळकावण्यात काँग्रेस पाकिस्तानला मदत करेल, अशा शब्दात गिरीराज सिंह यांनी टीका केली आहे.

दरम्यान, क्लबहाऊसमधली ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील टीका केली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी दिग्विजय सिंह यांच्या क्लबहाऊसबद्दल काय मत आहे? हीच काँग्रेसचीही भूमिका आहे? आम्ही मागणी करतो की राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण द्यावे, असे संबित पात्रा म्हणाले आहेत. त्यापाठोपाठ भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ही ऑडिओ क्लिप शेअर करून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.


दरम्यान ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपने यावरुन टीका सुरु केल्यावर दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यावर खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. अनपढ लोगों की जमात को Shall और Consider में फर्क शायद समझ में नहीं आता, असे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केल्यामुळे आता या मुद्द्यावरून टूलकिटप्रमाणेच नवा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.