मुंबई व ठाणे क्षेत्रात पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य


मुंबई : मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्यासह प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य मिळणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्याना जून महिन्यासाठी दि.5 जून पासून आतापर्यंत 3,164 मे.टन तांदूळ आणि 4,659 मे. टन गहू इतक्या अन्नधान्याचे 20 % शिधापत्रिकाधारकांना वितरण पूर्ण करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र लाभार्थ्यांना 5 जून पासून आतापर्यंत 2,390 मे.टन तांदूळ व 3,556 मे.टन गहू इतक्या अन्नधान्याचे 15% शिधापत्रिकाधारकांना मोफत वितरण करण्यात आले आहे. म्हणजेच त्याच लाभार्थ्यांना दोन वेळा अन्नधान्य वितरीत करण्यात आले आहे.

NER शिधापत्रिकाधारकांना देखील शासनाच्या देय परिमाणानुसार अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या सर्व परप्रांतिय स्थलांतरीत पात्र लाभार्थ्यांनी एक देश एक रेशन कार्ड “या योजनेअंतर्गत Portability द्वारे नजीकच्या अधिकृत शिधावाटप दुकानातून देय अन्नधान्य प्राप्त करून घ्यावे.

मुंबई व ठाणे शिधावाटप यंत्रेणतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशिलाबाबत शासनाच्या http://mahaepos.gov.in या वेबसाईटवरील RC Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या 12 अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी. उपरोक्त वितरणासंदर्भात तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक 022-22852814 तसेच ई-मेल क्रमांक [email protected] यावर तक्रार नोंदवावी.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूपासून वंचित राहू नये याकरीता आवश्यक सूचना सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांचेमार्फत शिधावाटप यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. सर्व लाभार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांनी अधिकृत शिधावाटप दुकानात गर्दी न करता योजनानिहाय धान्य सोशल डिस्टंन्सिंगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करुन प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई कैलास पगारे यांनी केले आहे.