मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी-सोमवारी अतिवृष्टीचा इशारा, घराबाहेर न पडण्याचे आवाहन


मुंबई : १३ जून आणि १४ जून रोजी अतिवृष्टीचा भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात १४ जून २०२१ या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

समुद्र किनारी आणि धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. गरज नसल्यास लोकांनी देखील घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईतील नियंत्रण कक्ष आणि इतर सर्व नियंत्रणांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीसह सुसज्ज ठेवण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात आहेत. एनडीआरएफ देखील आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर आहे. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिकाऱ्यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून ते देखील आवश्यकतेनुसार मदतीकरिता तत्पर आहेत.

सर्व विद्युत सबस्टेशन हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून त्यांची मदत पथके सुसज्ज व सतर्क आहेत. मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व कार्यतत्पर आहे. पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते, परिवहन आयुक्त यांचे समन्वय अधिकारी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहेत. दरम्यान मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास तेथे देखील त्वरित मदतीकरिता एनडीआरएफची एक तुकडी तेथे तैनात करण्यात आली आहे.