सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली परमबीर सिंह यांची याचिका


नवी दिल्ली – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एवढे वर्ष तुम्ही महाराष्ट्र पोलिसांत होता तरी त्यांच्यावर तुम्हाला विश्वास नाही का असा सवाल करत परमबीर सिंह यांना फटकारत ही याचिका फेटाळून लावली आहे.

आपल्याविरोधात करण्यात येणारी चौकशी हा सुडाचा भाग असल्याचे म्हणत यासाठी महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका माजी पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांनी दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे चौकशीदरम्यान उल्लंघन झाले असल्याचे याचिकेत म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी याचिकेच्या सुनावणी दरम्यान परमबीर सिंह यांची याचिका फेटाळून लावली. ३० वर्षे तुम्ही महाराष्ट्र पोलिसात काम करत होता, तरीपण तुम्हाला महाराष्ट्रातील पोलिसांच्या चौकशीवर विश्वास नाही ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. दाखल असलेल्या सगळ्याच गुन्ह्याविषयी आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी स्वतंत्र न्यायालये आहेत. यामुळे तुमची याचिका आम्ही फेटाळत आहोत. तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयात जायचे आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने सिंह यांना फटकारले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वी.रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. परमबीर सिंह यांच्या बाजूने वरिष्ठ वकिल महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला आहे.