शरद पवारांच्या सेनेसोबतच्या आघाडीबाबतच्या विधानावर नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया


मुंबई – शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शिवसेनेसोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भात सूचक विधान केले होते. शरद पवारांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे कौतुक देखील केले होते. पण शिवसेनेबाबतच्या त्यांच्या विधानावरून भाजपकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे.

यासंदर्भात भाजप आमदार राम कदम यांनी शरद पवारांना लक्ष्य केलेले असताना आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी शरद पवारांच्या विधानावर खोचक ट्वीट केले आहे. शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा त्याचा उलटअर्थी अर्थ लावायचा असतो. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी असल्याचे नारायण राणे म्हणाले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून आता दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या दिवशी बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे भवितव्य आणि लोकसभा-विधानसभेविषयी वक्तव्य केले होते. हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतेच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल याबाबत शंका नसल्याचे पवार म्हणाले होते. त्यावरून भाजपकडून खोचक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

दरम्यान, नारायण राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये शरद पवारांच्या विधानाचा संदर्भ घेऊन भाकित देखील केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार असल्याचे म्हणाले आहेत. जरी शरद पवार असे म्हणाले असले, तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार नसल्याचे भाकित राणेंनी आपल्या ट्वीटमध्ये वर्तवले आहे.

दरम्यान, याआधी भाजप आमदार राम कदम यांनी देखील शरद पवार यांनी शिवसेनेबाबत घेतलेल्या भूमिकेवरून टीका केली होती. शिवसेना हा वचन पळणारा मित्र आहे, असे शरद पवार यांना म्हणावे लागले ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची राजकीय हतबलता आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे वचन जो पक्ष पाळू शकला नाही, तो वचन पाळणारा पक्ष कोणत्या आधारावर असल्याचे राम कदम म्हणाले आहेत.

विशेष म्हणजे, नारायण राणे यांनी ही शरद पवारांची खेळी असल्याच्या आशयाने टीका केली असताना, त्यांच्याच पक्षाचे राम कदम यांनी मात्र शिवसेनेचे कौतुक करणे ही शरद पवारांची हतबलता असल्याची टीका केली आहे.