मुंबईकरांना पुढील आठवड्यात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता, ‘लोकल’ होऊ शकते सुरू


मुंबई – ठाकरे सरकारने राज्यात वारंवार लॉकडाऊन आणि अनलॉक करावा लागू नये, यासाठी पंचस्तरीय सूत्र तयार केले आहे. कोरोना परिस्थितीनुरूप निर्बंध वाढवण्याचा वा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यासाठी पाच टप्पे तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी नियमावली तयार केली असून, काही निकषही ठरवण्यात आले आहेत.

या निकषानुसार पुढील आठवड्यात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पाच टप्प्यापैकी पहिल्या टप्प्यात येणाऱ्या जिल्ह्यातील वा महानगरपालिकाला क्षेत्रातील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्याची सूट दिलेली आहे. त्याचबरोबर लोकल सेवा सुरू करण्यासही परवानगी दिलेली आहे. त्यामुळे मुंबईत लोकलसेवेबद्दल काय निर्णय होणार हे एकदोन दिवसात स्पष्ट होणार आहे.

उपलब्ध ऑक्सिजन बेड आणि पॉझिटिव्ही रेट असे काही निकष राज्य सरकारने ठेवलेले आहेत. पॉझिटिव्ही रेट जास्त असेल, अशा जिल्ह्यांतील वा शहरातील निर्बंध कायम ठेवण्याची सूचना यात करण्यात आलेली आहे. तर पॉझिटिव्ही रेट ५ टक्क्यांच्या आत असणाऱ्या जिल्ह्यात काही ठिकाणीच निर्बंध ठेवण्याची सूचना आहे. प्रत्येक आठवड्यातील पॉझिटिव्ही रेट आणि उपलब्ध बेडच्या संख्येनुसार स्थानिक प्रशासन हा निर्णय घेणार आहे.

राज्य सरकारने नुकतीच या आठवड्यातील सर्व जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटची यादी जाहीर केली असून, त्यात मुंबई आणि मुबई उपनगरांचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत म्हणजेच ४.४० टक्के एवढा कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध आणखी कमी होण्याबरोबरच सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याबद्दलचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारने महापालिकेला दिलेला असल्याने मुंबई महापालिका काय निर्णय घेणार, याकडे सगळ्याचेच लक्ष असणार आहे.