NCP@22; आगामी निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी युतीवर शरद पवारांचे मोठे विधान


मुंबई – शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो, असे कोणाला पटले नसते असे राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार आपण दिले असून हे सरकार पुढील पाच वर्ष टिकेल, असा विश्वास शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.

वेगळ्या विचारांचे सरकार आपण राज्याला दिले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र काम करु शकते, असे कोणला पटले नसते. पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. योग्य पावले तिन्ही पक्षांनी टाकली आणि आज हे आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत असल्याचे कौतुक शरद पवारांनी यावेळी केले. सरकार झाल्यानंतर किती दिवस टिकणार अशी चर्चा सुरु होती, अशी आठवण करुन देताना हे सरकार टिकेल आणि पाच वर्ष टीकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बसले आणि चर्चा केली असे सांगत लगेच वेगवेगळ्या शंका घेण्यात आल्याचे सांगत शरद पवारांनी यावेळी टीकाकारांना उत्तर दिले. आपण शिवसेनेसोबत कधी काम केले नाही, पण शिवसेनेलासुद्धा महाराष्ट्र कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणारच आहे. जनता पक्षाचं राज्य ज्यावेळी आले, त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना.

नुसते पुढेच आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसे होणार नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.

हे सरकार टिकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतेच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल याबाबत शंका नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

देशात अनेकांनी अनेक पक्ष काढले. जनता पार्टीचा प्रयोग १९७७ मध्ये झाला, पण दोन वर्षात तो प्रयोग संपला. असे अनेक पक्ष आले. पण राष्ट्रवादीने २२ वर्ष पूर्ण केली. सहकाऱ्यांच्या कष्टाने, जनतेच्या बांधिलकीमुळे आज आपण येथपर्यंत पोहोचलो आहेत. जनतेचा विश्वास संपादन करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. आपण कधी सत्तेत होतो. तर कधी नव्हतो, पण त्याचा त्याचा फारसा काही परिणाम होत नसल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

काही लोक गेले पण त्यामुळे नवीन लोक, नवीन नेतृत्व तयार झाले. मंत्रिमंळातील अनेक जण नवी जबाबादारी पार पडण्यात यशस्वी होत आहेत. हे लोकांसमोर एरव्ही आले नसते. देशात एवढे मोठे संकट आले असताना महाराष्ट्रात गंभीर स्थिती होती. संकटाचा सामना करण्यासाठी आणि लोकांना दिलासा, विश्वास देण्यासाठी राजेश टोपेंच्या नेतृत्वात आरोग्य खात्याने काम केले आणि त्याचा परिणाम या सगळ्या संकटातून बाहेर पडू शकतो असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला.

राजेंद्र शिंगणे, टोपे अशा प्रत्येकाने आपली जबाबदारी उत्तमपणे पार पडली. महाराष्ट्राला नेतृत्वाची फळी देऊन विश्वास देण्याचे काम राष्ट्रवादीने केले. राजकारणात नव्या पिढीला प्रोत्साहन आणि संधी दिली पाहिजे. उत्तम काम करत असेल तर पाठीशी उभे राहिलं पाहिजे, असे शरद पवारांनी यावेळी सांगितले. लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी सत्ता महत्वाची आहे. पण त्यामुळे नेतृत्वाची फळी निर्माण होते हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. याचे १०० टक्के श्रेय पाठीशी उभ्या राहणाऱ्या सामान्यांचे असून त्यांची बांधिलकी कायम ठेवली पाहिजे, असेही शरद पवारांनी यावेळी सांगितले.

कोरोना संकटातून बाहेर पडताना अनेक उपक्रम राबण्यात आले. शिवभोजन थाळीसारखा एक उपक्रम हाती घेतला. तो उपक्रम राबवण्यासंबंधी चर्चा झाली, तेव्हा माझ्याही मनात शंका होती. पण ते काम अतिशय उत्तम प्रकारे सुरु असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. संकटात आपण थांबलो नाही. तर कोरोनाला सामोरे गेलो. शिवभोजन थाळीसारखे कार्यक्रम राबवले. मोफत धान्य शेवट्या लोकांपर्यंत जातील याची काळजी घेतली, असे सांगत शरद पवारांनी आपल्याला राष्ट्रवादीच्या भवितव्याची चिंता नसल्याचे म्हटले आहे.

आपल्याला मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे प्रश्न सोडवावे लागतील. सत्ता अधिक हातात गेली पाहिजे. सत्ता एकाच ठिकाणी राहिली की भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे आणि हे मान्य असेल तर समाजातील प्रत्येत घटकाला आपण सत्तेचे वाटेकरी आहोत असे वाटले पाहिजे, असे शरद पवारांनी सांगितले.

राज्याचा मी मुख्यमंत्री असताना ग्रामपंचायत, गावचे पोलीस पाटील यामध्येही ओबीसी आणि इतरांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील एका गावात गेलो असता चहासाठी एका घरी गेलो होते. तिथे जुने काही कार्यकर्ते होते. त्यांनी मला साहेब हे काम काही चांगले केले नाही म्हटले. आमच्या गावची पाटीलकी गेल्यावर कसे व्हायचे, असे ते म्हणाले.

यावर नुकसान काय असे विचारले असता ते उत्तर देऊ शकले नाही. पुन्हा पाच ते सात वर्षांनी भेट झाली असता गाव आता पूर्वीपेक्षा आता एकत्रित असल्याचे सांगितले. याचे कारण पिढ्यानपिढ्या सत्ता आमच्या घरात ठेवली होती. सत्ता अधिक लोकांच्या हाती गेली हे लोकांना आवडले असल्याचे त्यांनी सांगितले, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.