राज्यात 7 जूनपासून पाच टप्प्यात होणार अनलॉक, अधिसूचना जारी!


मुंबई : राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच मुख्यमंत्री कार्यालयाने आज पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जातील.


सोमवारपासून (7 जून) ही अधिसूचना लागू होईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे त्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रशासकीय पातळीवरील या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाईल. या अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे.


अनलॉक करत असताना पाच टप्पे तयार करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात 15 जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या टप्प्यामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही. पण मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या टप्प्यात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल. 20 टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि 75 टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल.


पहिल्या टप्प्यात मॉल, थिएटर आणि सर्व दुकाने सुरळीत राहतील. तर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये मॉल आणि थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्तरातील शहर आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंधासह सेवा सुरु राहिल.

कोणत्या जिल्ह्यांचा कोणत्या टप्प्यात समावेश आणि काय बंद आणि सुरु राहणार?

पहिला टप्पा – अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ या 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉक करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सर्व सेवा सुरळीत राहणार आहेत.

  • सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरु होणार, मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह नियमितपणे सुरु होणार
    लोकल सेवा पूर्ववत होईल, पण स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्बंध घालण्याची मुभा असेल
  • जिम, सलू, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली होतील
  • सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत होईल, येथे जमावबंदी नसेल
  • खासजी कार्यालये सुरु होती, तर शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरु होतील
  • विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल
  • लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधने नसतील, या भागात जमावबंदी नसेल.

दुसरा टप्पा – हिंगोली, नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश आहे.

  • 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू राहतील
  • मॉल्स आणि सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील
  • सार्वजनिक जागा , मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील
  • बांधकाम क्षेत्रातील पूर्ण कामे सुरू राहतील
  • कृषी क्षेत्रातील कामे पूर्ण सुरू राहतील
  • ई सेवा पूर्ण सुरू राहील
  • जिम, सलून, स्पा,वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील
  • बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने सुरू राहतील
  • जिल्हयाच्या बाहेर खाजगी वाहन, बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे. मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.

तिसरा टप्पा – मुंबई आणि उपनगर, ठाणे, नाशिक,औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील
  • मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील
  • हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.
  • सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू रहातील
  • खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील
  • इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील
  • सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओमध्ये परवानगी असेल
  • सामाजिक, संस्कृती, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार)
  • लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहील
  • कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील
  • दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल

चौथा टप्पा – पुणे, बुलढाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील
  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने पुर्ण वेळ बंद रहातील
  • सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील
  • हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील
  • सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)
  • अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील
  • शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती
  • स्पोर्टसमध्ये आऊटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील
  • कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही
  • लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक
  • राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील
  • ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामे सुरू रहातील
  • कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.
  • ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील
  • सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही
  • बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही
  • संचारबंदीचे नियम लागू राहतील

पाचवा टप्पा – सध्या पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही. जर पुढील आठवड्यात जास्त रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या टप्प्यामध्ये समावेश होईल.