आंतरजिल्हा प्रवासासाठी आता ई-पासची गरज नाही


मुंबई : तुम्हाला जर येत्या सोमवारपासून (7 जून) गावी जायचे असेल, तर तुम्हाला विना ई-पास जाणे सहज शक्य होणार आहे. कारण अनलॉकच्या गटनिहाय जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार फक्त पाचव्या गटातील भागात ई-पास बंधनकारक असेल. शिवाय, प्रवास करताना पाचव्या गटातील कुठल्याही भागात तुमचा थांबा म्हणजेच स्टॉप असेल तर मात्र तुम्हाला ई-पास बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण या दिलासादायक बाब अशी की, सध्या राज्यातील कुठलेही शहर किंवा जिल्ह्याचा पाचव्या गटात समावेश नसल्यामुळे सध्यातरी कोणालाही आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची गरज भासणार नाही.

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा काही कठोर पावले उचण्यास सुरुवात केली होती. ज्याअंतर्गत राज्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले होते. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले. याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली होती.

अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना ई पास काढणे बंधनकारक होते. नागरिकांना काही महत्त्वाच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई- पास काढणे अनिवार्य होते. अर्थात यावर स्थानिक प्रशासनाचा निर्णयही महत्वाचा असेल. पुढच्या सोमवार ते रविवारपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. त्यानंतर पुढच्या शुक्रवारी प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर स्थानिक प्रशासन आपल्या जिल्ह्याचा कुठल्या गटात समावेश होतो, हे जाहीर करुन त्यानुसार तिथे निर्बंध लागू होतील.