‘शिवराज्याभिषेक सोहळा’ दिनासाठी नियमावली जारी


मुंबई – काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने संपुर्ण राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक दिन हा “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून यासाठी निर्देश आणि मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

राज्यातील पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयांना त्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्यामुळे राज्यात शिवस्वराज्य दिन कशाप्रकारे साजरा करायचा आहे. याची नियमावली सादर करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ६ जून हा दिवस शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे.

भगवा स्वराज्यध्वज संहिता – ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटीन असलेली भगवी जरीवाली पताका असावी. ध्वज हा २ फुट रुंद आणि ६ फूट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदी पेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा.

शिवशक राजदंड स्वराज्यगुढी संहिता – शिवशक राजगडाचे प्रतीक म्हणून कमीतकमी १५ फुल उंचीचा वासा किंवा बांबु असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान ५ ते ६ फुटाचा आधार द्यावा.

आवश्यक साहित्य – सुवर्ण कलश, पुष्पहार, गादी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षता, हळद, कुंकु, ध्वनीक्षेपक.

६ जुन रोजी सकाळी ९ वाजता शिवशक राजदंडावर भगवा स्वराजध्वज बांधुन घ्या. शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करुन रयतेची झोळी सुख, समृद्धी, समता व स्वातंत्र्याने भरली म्हणून शिवशक राजगडाच्यावर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा “सुवर्ण कलश” बांधावा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंधाने लिहुन त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी व शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सरळ उभी करावी. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणून सांगता करावी.

सुर्यास्तमाला- शिवशक राजदंड स्वराज्यगुढी खाली घ्यावी. भगवा स्वराज्यध्वज व्यवस्थित घडी करुन ठेवून द्यावा.