देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांचा खुलासा


पुणे – सोमवारी (३१ मे रोजी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती. फडणवीस यांनी मुंबई येथील सिल्वर ओके या पवारांच्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली होती. राजकीय वर्तुळात या भेटीनंतर चर्चांना उधाण आले होते.

पण आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याच भेटीबद्दल खुलासा करताना फडणवीस शरद पवारांना का भेटले याची माहिती पुण्यामधील एका पत्रकार परिषदेमध्ये दिली. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त पाटील हे पुण्यातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुंडेच्या कार्यासोबतच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले.

भाजपचा संघर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींमधून संपणार आहे का ? असा प्रश्न पाटील यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले, भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही. अनेक कारणांनी भेटीगाठी सुरु आहेत. शरद पवार आजारी आहेत, त्याबद्दल चौकशी करण्यासाठी फडणवीस गेले होते.

तसेच पुढे बोलाताना पाटील यांनी, त्यानंतर फडणवीसांनी रक्षा खडसेंची देखील भेट घेतली. दुश्मन जरी असला तरी त्याची भेट घेणे, ही आपली संस्कृती आहे. संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. जर संवाद नसेल तर अडचण असते. पण येथे फडणवीस असल्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे पाटील म्हणाले.

गोपीनाथराव मुंडे यांचे ३ जून २०१४ रोजी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना निधन झाले. त्या घटनेला आज सात वर्षे झाली. त्याच पार्श्वभूमीवर आज दुपारी डाक विभाग त्यांच्यावर एक विशेष पोस्ट एनव्हलप प्रकाशित करत आहे. गोपीनाथ मुंडेंचे सतत संघर्ष हे ध्येय होते. कार्यालयातील भारतीय जनता पार्टी त्यांनी रस्त्यावर आणली. गोपीनाथराव यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले, अशा शब्दांमध्ये पाटील यांनी मुडेंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून शरद पवार यांच्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी टीका केल्यासंदर्भातही पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार हे सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. तसे म्हटल्यानंतर त्यांच्यावर दोष जातो. माझी चर्चा करायची तयारी आहे. मी निकाल वाचला. त्यात पावला पावलावर जाणवते, चुका आहेत. ॲार्डिनन्सचा कायदा केला नसल्याचे भाष्य पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केले.