सिंधुदुर्ग : राज्यसभेतील भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांत मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील अन्य महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली. यासंदर्भात सरकारला संभाजीराजे यांनी तीन पर्याय सुचविले आहेत. तसेच आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत समाजाच्या विकासासाठी पाच मागण्याही सरकारसमोर मांडल्या आहेत. त्यामुळे या मागण्यांवर येत्या ६ जूनपूर्वी ठोस कार्यवाही करावी, अन्यथा शिवराज्याभिषेक दिनी किल्ले रायगडावरून आंदोलनाची हाक देऊ. तेव्हा कोरोना वगैरे काही पाहणार नसल्याचा इशाराही खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे.
मागील आठवड्यात कोकण किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळामूळे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिराचे नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो. परंतू, समुद्र खवळलेला असल्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता आले नाही. त्यामुळे श्रीशिवराजेश्वराचे दुरूनच दर्शन घेतले.
… pic.twitter.com/8fgPBcOthd— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 31, 2021
तोक्ते चक्रीवादळामुळं सिंधुदुर्ग किल्याच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी संभाजीराजे आले होते. पण, समुद्र खवळलेला असल्यामुळे त्यांना किल्यावर जाता आले नाही. समुद्र शांत झाल्यानंतर ते पाहणी करतील, अशी शक्यता आहे. पण संभाजीराजे यांनी या दौऱ्यादरम्यान नुकतेच एक ट्विट केले आहे. संभाजीराजे यांनी या ट्विटद्वारे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे.
माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही.
पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 31, 2021
संभाजीराजे म्हणाले की, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. तसेच मला हेच लक्षात येत नाही की, माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.
४ जून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची तारीख आहे. सर्वोच्च न्यायालयाने ती वाढवली असल्यामुळे अहवाल द्यायची तारीख सुद्धा पुढे गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढू, असे जाहीरपणे सांगितले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नक्कीच यातून मार्ग काढतील, असा विश्वासही संभाजीराजेंनी यावेळी व्यक्त केला.