कितीही संकटे आली तरी राज्याचा विकास थांबणार नाही – अजित पवार


मुंबई – आज(सोमवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील टर्मिनल १ व टर्मिनल २ येथील नियंत्रित प्रवेश मार्ग प्रकल्पाचे भुमिपूजन पार पडले. तसेच, आजपासून मुंबईला अधिक वेगवान बनवणाऱ्या मेट्रो 2A व मेट्रो 7 चाचणीला सुरूवात झाली आहे. कांदिवलीमधील आकुर्ली स्टेशनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मल्टीप्लीस्टिज पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची देखील या कार्यक्रमास उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना केंद्रीय नेतृत्वाकडून काहीसा भेदभाव केला जात असल्याचे जाणवत असल्याचे बोलून दाखवले. तसेच, कितीही संकटे आली तरी राज्याचा विकास थांबणार नसल्याचेही अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले, तोक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान सर्वप्रथम मुंबईत येणार होते, त्यानंतर ते गुजरातला जाणार होते. पण काही कारणामुळे पंतप्रधानांचा मुंबई दौरा रद्द झाला, याचे कारण आम्हाला कळू शकलं नाही. परंतु पंतप्रधान थेट गुजरातला गेले अन् गुजरातची मागणी काही नसताना देखील, खरंतर मागणी ही नंतर होत असते, परंतु तत्काळ त्यांनी १ हजार कोटी जाहीर केले. महाराष्ट्राला जेवढे योग्य वाटतील तेवढे तरी पैसे त्यांनी द्यायला हवे, त्यातही आम्ही समाधानी होऊ. कारण, आम्ही सर्वांनी दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निसर्ग चक्रीवादळाचा विचार करून, कोकणवासीयांना मदत करण्याची भूमिका घेतली.

तसेच, माझे एवढेच म्हणणे आहे की राज्यकर्ते येत असतात, जात असतात बदल होत असतात. शेवटी जनतेच्या मनात जे असते जनता त्यांना निवडून देत असते. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमधून आपण सर्वांनी हे पाहिले आहे. शेवटी वरच्या ठिकाणी देखील कुणीही राज्यकर्ते असले, मागील काळात मनमोहन सिंग, शरद पवार, पी. चिदंबरम हे काम करत होते, तेव्हा असा भेदभाव कधी होत नव्हता. पण तो थोडासा जाणवतो आहे. यामध्ये कितपत तथ्य आहे नाही याबाबत सगळ्यांनी नीट विचार करावा, एवढीच माझी निमित्त अपेक्षा असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवले.