राज्यातील कृषि दुकाने लॉकडाऊन काळात दिवसभर सुरु राहणार; कृषिमंत्री दादा भुसे


परभणी : राज्य सरकारच्या ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर आणि तेथील ऑक्सिजन बेडची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार, 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येणार आहेत. भले राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवला असला तरी राज्यातील कृषि क्षेत्राशी संबंधित सर्व आस्थापने खरीप हंगाम लक्षात घेता दिवसभर सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.

हा निर्णय परभणीत कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कृषी क्षेत्राच्या लातूर विभागीय आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत कुठेही शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, याचा विचार करुन आता सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शेती आणि शेतीशी निगडीत असलेल्या व्यवस्थापनांची, ट्रॅक्टर दुरुस्तीची आणि ड्रिपची आस्थापने चालू ठेवण्यास अनुमती देण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यावर्षी मान्सून वेळेवर असून पेरणी आणि इतर शेतीविषयक कामांसाठी या सुविधा कोरोनाचे सर्व नियमे पाळून सुरु ठेवण्याबाबत खबरदारी घेण्याचेही यावेळी बोलताना कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.