निलंबित मोटार वाहन निरीक्षकाने दिलेली तक्रार पूर्णतः निराधार व खोटी – परिवहन मंत्री अनिल परब


मुंबई : माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी असल्याची प्रतिक्रिया ट्विटरवरुन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो असा आरोप केला आहे. या तक्रारीत अधिकाऱ्यांच्या मदतीने 300 कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचा म्हटले आहे.

माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे. विभागातील अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे. मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नसल्याचे भासवून उच्च न्यायालयामार्फत सीबीआय चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे. या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून, चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. पोलीस उपायुक्त (क्राईम ब्रांच) आणि इतर दोन उपायुक्त या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पाच दिवसात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान गजेंद्र पाटील अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. ते 31 मे नंतर हजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान अनिल परब यांची राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पाठराखण केली आहे. खालच्या स्तरावर काय होते, याला मंत्री जबाबदार कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच हे प्रकार चालूच राहणार, गुन्हा दाखल करायचा, नाहीतर न्यायालयात जायचे हा जुना खेळ आहे. हे विरोधी पक्षाचे षडयंत्र असल्याचेही भुजबळ म्हणाले.