१५ वर्षांपूर्वी नावाशिवाय जन्म नोंदणी झालेल्यांनी नावाची नोंदणी करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन


मुंबई २८ : राज्यातील ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची नावाशिवाय जन्म नोंदणी झाली आणि त्याला १५ वर्षे झाली आहेत अशांनी जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंदणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची जन्म नोंदणी नावाशिवाय झाली व त्याला १५ वर्षे झाली असतील त्यांनी अशा जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंदणी करून घ्यावी. यामध्ये सन १९६९ पूर्वीच्या जन्म नोंदणींचा देखील समावेश आहे.

नावाची नोंदणी २७ एप्रिल २०३६ पर्यंत करता येणार आहे. त्यानंतर जन्म नोंदणीमध्ये बाळाच्या नावाची नोंदणी करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी ज्या ठिकाणी जन्माची नोंदणी केली आहे तेथे नागरीकांनी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.