पायी वारी संदर्भात पुढच्या कॅबिनेट बैठकीत घेणार अंतिम निर्णय


पुणे : आज पालखी सोहळ्याच्या मान्यवरांना आषाढी वारी संदर्भात बोलावण्यात आले होते. बहुतेकांचा आग्रह आहे की कमीत कमी लोकांमध्ये वारी काढतो, आम्हाला परवानगी द्या. पण मुख्यमंत्र्यांच्या कानावर या भावना पुढच्या कॅबिनेटमध्ये घालणार असून त्यातच वारी बाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन कण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी (दि.28) रोजी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, पायी वारीची मागणीचा आग्रह वारकरी संप्रदायाकडून धरला जात आहे. पण राज्यात आजही असे १८ जिल्हे आहेत जिथे कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यात ती साताऱ्यात जास्त आहे. त्यांचे म्हणणे की आम्ही इतरांना येऊ देणार नाही. वारकरी संप्रदाय जे म्हणतो ते करतो. पण वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.

अजित पवार म्हणाले, सध्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची परिस्थिती गंभीर आहे. लॉकडाऊन लावण्यात किंवा पालखी सोहळा बंद ठेवण्याची आम्हाला हौस नाही. पण दुसरा पर्याय उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील हावसे गवसे यांची संख्या मोठी असते. तसेच पालखी सोहळ्यादरम्यान रोज टेस्टिंग केले आणि तरी कोरोनासंख्या आढळली तर पालखी थांबवता येणार नाही. त्यामुळे काय तो चांगला निर्णय घ्या.

यावर्षी ५०० लोकांना वारी करायची परवानगी द्यावी अशी भुमिका वारकऱ्यांनी घेतली आहे. ५०० नाही तर २०० वारकऱ्यांना पांडुरंगापासुन दुर रहावे लागत आहे. त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आम्ही केली आहे. अंशतः: संचारबंदी लावा. लसीकरण करा. कोरोना संबंधीचे नियम पाळायला, आम्ही तयार आहोत. पालखी सोहळ्याचे पहिले प्रस्थान १४ जुनला आहे. सर्व वारकरी संस्थांनी एकमत करुन निवेदन देत पायी वारीसाठी परवानगी मागितली आहे.