रुग्णालयांकडून रुग्णांची होणारी लूट थांबवण्यासाठी राजेश टोपेंनी केली मोठी घोषणा


पुणे – राज्यावर ओढावलेल्या कोरोनाचा कहर कायम असून याच दरम्यान आपले जीव धोक्यात घालून रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांना सगळ्यांनीच कोरोना योद्ध्यांचा मान दिला आहे. पण, अजूनही रुग्णांच्या नाईलाजाचा गैरफायदा घेऊन काही रुग्णालयांकडून त्यांची आर्थिक लूट करण्याचे प्रकार समोर येत आहेत. पुण्यातील अशा रुग्णालयांना चाप बसवण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यामध्ये पुण्यातील रुग्णालयांकडून कोरोना उपचारांसाठी लावण्यात येणाऱ्या प्रत्येक बिलाचे ऑडिटरमार्फत ऑडिट केले जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.

आत्तापर्यंत फक्त दीड लाख रुपयांच्या वरच्या बिलांचेच ऑडिट केले जात होते. पण आता प्रत्येक बिलाचे ऑडिट केले जाणार असल्याची घोषणा पुण्यातील कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी केली आहे.

अशा प्रकारे रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी याआधी देखील आल्या होत्या. त्यानुसार ऑडिटरमार्फत दीड लाखांच्या वरच्या बिलांचे ऑडिट करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. पण, त्यानंतर देखील काही रुग्णालये त्यातून पळवाट काढताना दिसून आली. यामध्ये दीड लाखांच्यावर असेल, तर ती दीड-दीड लाखांच्या स्वतंत्र बिलांमधून वसूल केली जात होती. त्याला आळा बसावा, यासाठी आता प्रत्येक बिलाचे ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यासाठी प्रत्येक रुग्णालयात ऑडिटर आवश्यक करण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, यावेळी राजेश टोपे यांनी पुण्यात म्युकरमायकोसिसचे उपचार देणाऱ्या रुग्णालयांसंदर्भात देखील महत्त्वपूर्ण घोषणा केली. म्युकरमायकोसिसचे उपचार पुण्यातील रुबी, जहांगीरसारख्या रुग्णालयांमध्ये दिले जातात. पण, सरकारच्या यादीमध्ये ही रुग्णालये समाविष्ट नसल्यामुळे तेथील रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांचा लाभ मिळत नसल्यामुळे या रुग्णालयांचा देखील सरकारी यादीमध्ये समावेश करण्यासंदर्भात पावले उचलण्यात आल्याची माहिती टोपेंनी यावेळी दिली.

दरम्यान, राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करून संस्थात्मक विलगीकरणच करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे. त्यानुसार हळूहळू पुण्यातील होम आयसोलेशन कमी करणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

पुण्यात ८० टक्क्यांपर्यंत होम आयसोलेशनच्या केसेस होत्या, त्या आता ५६ टक्क्यांवर आल्या आहेत. त्या केसेस आता २५-३० टक्क्यांपर्यंत आणणे म्हणजे होम आयसोलेशन कमी करून संस्थात्मक विलगीकरण जास्त व्हायला हवे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गरज लागल्यास नवीन कोविड केअर सेंटर्स उभारून, तिथे सर्व आरोग्यव्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

राज्यात कोरोना रुग्णांचे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग वैज्ञानिक पद्धतीनेच व्हायला हवे, असे देखील राजेश टोपे यांनी यावेळी नमूद केले. संपूर्ण महाराष्ट्रात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग वैज्ञानिक पद्धतीनेच करायला हवे, असे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. आपण चौकात उभे राहून लोकांच्या चाचण्या करणे आणि त्यातून पॉझिटिव्हिटी रेट कमी करत आणणे, हे आपल्याला करायचे नाही. चाचण्या हाय रिस्क आणि लो रिस्कमध्येच व्हायला हव्यात. चाचण्यांची संख्या अजिबात कमी होता कामा नये.

चाचण्यांमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर आहे, ते पहिल्याच क्रमांकावर राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. संस्थात्मक विलगीकरण केल्यामुळे रुग्णाची ऑक्सिजनची पातळी आणि इतर निरीक्षणं रोज केली जातील. यामुळे विषाणूचा फैलाव कमी होईल. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारच्या निर्बंधांव्यतिरिक्त शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. पण, आज घेतलेल्या निर्णयानुसार शनिवार-रविवार पुण्यातील अत्यावश्यक सेवांवर असणारे निर्बंध उठवण्यात आल्याचे देखील राजेश टोप यांनी सांगितले.