राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे : खासदार संभाजीराजे


औरंगाबाद : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु केला. त्यांनी या दौऱ्यात विविध ठिकाणच्या मराठा समाजाच्या मागण्या आणि आरक्षणाच्या त्यांच्या मागण्या जाणून घेणे हा मुख्य हेतू केंद्रस्थानी ठेवला. आपण पदाचा राजीनामा देण्याने समाजाला आरक्षण मिळणार असेल, तर तसेही करण्यास सज्ज असल्याची तयारी त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली.

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी सध्याच्या घडीला एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, यासाठी संभाजीराजे आग्रही दिसले. राज्य शासनाने मराठा समाजाला न्याय द्यावा, असे म्हणताना यावेळी मराठा समाजाच्या आंदोलनाला भाजपने दिलेल्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया देणे मात्र त्यांनी टाळले.

मराठा आरक्षणाला राजकीय वळण देऊ नका. किंबहुना आताची वेळच अशी आहे की राज्यकर्त्यांनी भूमिका मांडणे अतिशय गरजेचे आहे. मराठा समाजासाठी तुम्ही काय करणार ते स्पष्ट करणे गरजेचे असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. सध्याच्या घडीला हा विषय न्यायप्रविष्ट असला तरीही कोविड काळ निवळेल त्या वेळी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरावच लागेल, 30 टक्के गरीब मराठा समाजासा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्याचा हेतू अधोरेखित करत आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला.

मी महाराष्ट्र दौरा लोकांच्या भावना समजण्यासाठी करत आहे, कोणत्याही पक्षाचा याच्याशी संबंध नाही. या दौऱ्यात मुख्यमंत्री, शरद पवार, विरोधी पक्ष नेत्यांना भेटणार आणि मराठा समाजाला काय देता येईल, या बाबत चर्चा करणार, असल्याचे यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले.