निलेश राणे यांच्या त्या गुप्त बैठकीच्या गौप्यस्फोटावर उदय सामंत यांनी सोडले मौन


मुंबई – राज्याच्या राजकारणात माजी खासदार निलेश राणे यांनी एक ट्विट करत खळबळ उडवून दिली. निलेश राणे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाल्याचा गौप्यस्फोट केला. राणे यांच्या ट्विटनंतर नेमकी कशा संदर्भात गुप्त बैठक झाली आणि उदय सामंत आणि फडणवीस यांच्यात काय खलबते झाली, अशी चर्चा सुरू झाली. त्यावरून वेगवेगळ्या चर्चाही सुरू झाल्या. अखेर या सगळ्या प्रकरणावर उदय सामंत यांनी मौन सोडले. सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडत निलेश राणे यांना उत्तर दिले आहे.

उदय सामंत माध्यमांशी बोलताना म्हणाले, माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली, हे कुणी सांगितले, ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कोकणाने दोन-दोन वेळा ज्या मंडळींना नाकारले. त्यांनी माझे राजकीय अस्तित्व अस्थिर करण्यासाठी गुप्त बैठक झाली. राजकीय खलबते झाली, अशा प्रकारचं ट्विट करणे, हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये बसत नाही. भेट झाली. कुठे झाली. बंद खोलीत झाली, अशा प्रकारच्या बातम्या मी ऐकत आहे. त्यांच्या आरोपांवर मी कधीही बोलत नाही, कारण जनतेच त्यांची दखल घेतलेली नाही, तर माझ्यासारख्या मंत्र्याने का घ्यावी?, असा खोचक सवाल सामंत यांनी केला.

आता मुद्दा गुप्त बैठकीचा. गुप्त बैठक करायचीच होती, तर मतदारसंघात कशाला करू. रत्नागिरीच्या गेस्ट हाऊसवर दोनशे लोकांच्या समोर कशाला करू? गुप्त बैठक करायची असेल, तर नागपूर, मुंबई, चेन्नई हैदराबाद अशा शहरात जाऊन गुप्त बैठक करेल ना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारची ट्विट करून उद्धव ठाकरे यांचा माझ्यावरचा विश्वास उडेल, अशा भ्रमात जर कुणी असेल, तर हे बालिशपणाचे असल्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणे मी टाळतो. याचा अर्थ मी घाबरतो असे नाही, पण कुणाबद्दल बोलावे, असा टोला सामंत यांनी लगावला.

बैठकीबद्दल सांगायचे झाले, तर ही घटना सहा दिवसांपूर्वी घडली. पहाटे शपथविधी झाला आणि सकाळी गौप्यस्फोट झाला, तर मी त्याला गौप्यस्फोट समजू शकतो. पण सहा दिवसांपूर्वी मी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहावर १ वाजता पोहोचलो. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्याठिकाणी आले. महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे, जी आम्हाला शिकवली गेली. त्याप्रमाणे मी त्यांचे स्वागत केले. त्यात मी काही पाप केले नाही. मी एकटा कुणाला भेटलो नाही. ज्यांनी कुणी आरोप केला आहे, ते खूप मागे उभे होते. तिथे प्रविण दरेकर, रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड होते आणि त्यानंतर ते (निलेश राणे) होते. त्यामुळे कदाचित बघण्यात फरक होऊ शकतो.

पण माझ्या मतदारसंघात फडणवीस आल्यानंतर त्यांना भेटलो असेल, मी हा गुन्हा केला, असे मला वाटत नाही. पण देवेंद्र फडणवीस आणि दरेकरांना मला मित्र म्हणून सल्ला द्यायचा की, अशा पद्धतीने राजकीय संस्कृती बिघडवणाऱ्यांना जर आपण सोबत ठेवणार असाल, तर भविष्यातील महाराष्ट्राचे राजकारण काय असू शकते याची प्रचिती आली असेल, असं सामंत यांनी म्हटले आहे.