ICMR करणार कोरोना झटपट बरा करणाऱ्या आयुर्वेदिक औषधाची तपासणी


नेल्लोर (आंध्र प्रदेश) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु असून कोरोनावरील औषधासाठी संशोधन सुरु आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपटणम या छोट्याशा गावात कोरोनावरील आयुर्वेदिक औषधासाठी भलीमोठी रांग पाहायला मिळत आहे. झटपट कोरोना बरा करणाऱ्या या औषधासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने येथे येत आहेत.

कोरोनावर आपले हे औषध प्रभावी असल्याचा दावा बी आनंदय्या नावाच्या वैद्याने केला आहे. सोशल मीडिया त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, परिणामी याठिकाणी दूरुन लोक येऊ लागले आहेत. त्याचबरोबर शेजारच्या राज्यांमधूनही अनेक नागरिक हे औषध घेण्यासाठी येत आहेत. आनंदय्या यांनी तयार केलेल्या औषधाची तुलना हैदराबादमधील बथिनी बंधूंनी दमा बरा करण्यासाठी तयार केलेल्या ‘फिश प्रसादम’ औषधासोबत केली जात आहे.

दरम्यान कोरोनावर हे आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे का, यामुळे आजारी व्यक्ती बरा होतो का हे अद्याप समजू शकलेले नाही. तरी देखील मोठ्या संख्येने नागरिक या गावात औषधासाठी गर्दी करत आहेत. परंतु हे औषध घेण्यासाठी सोशल डिस्टन्सचा मात्र पुरता बोजवारा उडाला.

या आयुर्वेदिक औषधाचे कृष्णपट्टणम कोरोना औषध असे नाव आहे. आपले आयुर्वेदिक औषध आनंदय्या लोकांना मोफत देत आहेत. शिवाय ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना आयड्राप देखील दिला जातो. या औषधाचे दोन थेंब डोळ्यात टाकल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ऑक्सिजन पातळी वाढते, असा दावा केला जात आहे. तर गुळवेल, कडूनिंब, काळीमिरी, आले आणि हळद यांच्या मिश्रणातून तयार केलेल्या आयुर्वेदिक गोळ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दिल्या जातात. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही या गोळ्या दिल्या जात आहेत.


कोरोना संबंधित एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी कृष्णपट्टणममधील औषधाबाबत माहिती घेतली. तर हे औषध प्रभावी आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही आयसीएमआर आणि तर तज्ज्ञांमार्फत या औषधावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री ए के के श्रीनिवास यांनी आढावा बैठकीनंतर सांगितले. हे औषध कोरोनावर प्रभावी आहे की नाही, तसेच हे औषध बनवण्याची कृतीच्या संशोधनासाठी आंध्र प्रदेश सरकारने तज्ज्ञांचे पथक तसेच आयसीएमआरची एक टीम नेल्लोरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय आयुष मंत्री आणि आयसीएमआरला या औषधावर संशोधन करायला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही सांगितल्याचे कळते. व्यंकय्या नायडू देखील एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील आहेत. दरम्यान हे औषध ज्यांनी वापरले त्यांच्यात कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत, असे आमदार के गोवर्धन रेड्डी यांनी सांगितले. तर दुसरीकडे जिल्हा पंचायत अधिकारी धनलक्ष्मी याच्या नेतृत्त्वाखाली नेल्लोरचे जिल्हाधिकारी के व्ही एन चक्रधर बाबू यांनी एका समितीची नेमणूक केली असून त्यात आयुष डॉक्टर आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय ज्या रुग्णांनी या औषधाचे सेवन केले, त्यांच्यात दुष्परिणाम दिसले नसल्याचे म्हटले. दरम्यान या औषधाचे नमुने तपासणीसाठी हैदराबादमधील आयुष प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.